Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

वनडेतूनही विराट कर्णधारपदावरुन होणार पायउतार! शास्त्रींचा दावा

भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सोडली असून आता रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे.
Published on

भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची (Team India) कमान सोडली असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचे नेतृत्व करणार आहे. कोहली अजूनही एकदिवसीय आणि कसोटी संघांचा कर्णधार आहे, परंतु इतर दोन्ही फॉरमॅटमधील त्याच्या नेतृत्वाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोहलीसोबत सलग 4 वर्षे टीम इंडियाची धुरा सांभाळणारे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारताचा दिग्गज फलंदाज आगामी काळात इतर फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याची शक्यता व्यक्त केली आहे, जेणेकरुन तो स्वत:च्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करेल.

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकापूर्वीच या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोहलीने स्वत:वरील जबाबदारीचे ओझे कमी करुन उर्वरित दोन फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला तयार केल्याचे नमूद केले होते. मात्र, कोहली त्याच्या नेतृत्वाखाली सलग चार आयसीसी स्पर्धांमध्ये एकही विजेतेपद मिळवू शकला नसल्याने कोहलीवर दबाव वाढत आहे. आता टी-२० फॉर्मेटनंतर वनडे संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडून घेतले जाऊ शकते, असे मानले जात आहे. कारण बीसीसीआय मर्यादित षटकांमध्ये एकच कर्णधार ठेवण्याच्या बाजूने आहे.

Virat Kohli
T20 World Cup: 'संघ निवडीत माझा अन् कोहलीचा समावेश नव्हता'

वनडेत कर्णधारपद सोडू शकतो

बीसीसीआय काय निर्णय घेणार हे येत्या काही दिवसांत कळेल, पण गेल्या चार वर्षांत टीम इंडियामध्ये कोहलीच्या सर्वात जवळचे राहिलेले माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी संकेत दिले आहेत. कोहली कदाचित एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकतो. जेणेकरुन त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करु शकतो. टीम इंडियाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शास्त्रींनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना माजी भारतीय प्रशिक्षक म्हणाले,

“गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र, भविष्यात फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो कर्णधारपद सोडू शकतो. हे लगेच होणार नाही, परंतु ते होऊ शकते. आता त्याला फक्त कसोटी कर्णधारपदावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे तो म्हणू शकतो.

2017 पासून सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार होता

कोहलीने 2015 मध्ये कसोटी आणि 2017 मध्ये ODI-T20 संघाची जबाबदारी स्वीकारली होती. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली, तर टीम इंडिया इंग्लंडमधील कसोटी मालिकेत पुढे आहे आणि दक्षिण आफ्रिकेतही कसोटी सामना जिंकला. 38 विजयांसह तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com