

भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून तो एक धर्म मानला जातो. इथे क्रिकेटर्सना देवाचा दर्जा दिला जातो, ज्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर. सचिनला पाहूनच देशातील करोडो तरुणांनी हातात बॅट आणि बॉल घेतला आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अनेकांनी भारतीय संघात स्थान मिळवले आणि देशाचे नाव जगभरात मोठे केले. परंतु, याच झगमगाटाच्या मागे एक अशी गडद बाजूही आहे, जिथून अनेक प्रतिभावान खेळाडूंचे करिअर संपण्याच्या मार्गावर आले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पुरेशी संधी न मिळणे, मानसिक दडपण आणि उपेक्षेमुळे आता अनेक क्रिकेटपटू देशाचा त्याग करून परदेशात खेळण्याचा निर्णय घेत आहेत.
नुकतीच भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावात कोणत्याही संघाने विजय शंकरला खरेदी केले नाही, म्हणजेच तो 'अनसोल्ड' राहिला.
भारतात खेळण्याच्या संधी संपुष्टात आल्याचे पाहून त्याने आता श्रीलंकेत होणाऱ्या 'लंका प्रीमियर लीग'चा रस्ता धरला आहे. विजय शंकर हा असा पहिला खेळाडू नाही, यापूर्वी सुरेश रैना, अंबाती रायडू आणि उन्मुक्त चंद यांसारख्या अव्वल खेळाडूंनीही भारतीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू सुरेश रैना जेव्हा आयपीएल आणि टीम इंडियातून बाजूला सारला गेला, तेव्हा त्याच्यात बरेच क्रिकेट शिल्लक होते. मात्र, भारतात संधी मिळत नसल्याने त्याने निवृत्ती पत्करली आणि अबू धाबी टी-१० लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळायला सुरुवात केली. आज तो विविध देशांतील लीजेंड्स लीग गाजवत आहे.
अशीच काहीशी कथा अंबाती रायडूची आहे. आयपीएल २०२३ चे विजेतेपद मिळवल्यानंतर रायडूने भारतीय क्रिकेटचा निरोप घेतला आणि अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (टेक्सास सुपर किंग्ज) व कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा करार केला. मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) नियमांमुळे त्याला या लीगधून माघार घ्यावी लागली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नियमांनुसार, कोणताही सक्रिय भारतीय खेळाडू बीसीसीआयशी जोडलेला असेपर्यंत कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. जर एखाद्या खेळाडूला परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल, तर त्याला भारतीय क्रिकेटमधून पूर्णपणे संन्यास घ्यावा लागतो.
इतकेच नव्हे तर, खेळाडूंनी लगेच परदेशी लीगमध्ये जाऊ नये म्हणून बीसीसीआयने '१ वर्षाचा कूलिंग-ऑफ कालावधी' लागू केला आहे. या नियमानुसार, निवृत्तीनंतर खेळाडूला एक वर्ष कोणत्याही क्रिकेटपासून दूर राहावे लागते, त्यानंतरच तो परदेशी लीगसाठी पात्र ठरतो. याच नियमामुळे अंबाती रायडूला अमेरिकन लीगधून नाव मागे घ्यावे लागले होते.
भारताला २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद याने २०२१ मध्ये अवघ्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आणि तो अमेरिकेत स्थायिक झाला. त्याच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला होता. जरी आज त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असला, तरी तो जगभरातील इतर व्यावसायिक लीगमध्ये आपली चमक दाखवत आहे.
खेळाडूंनी देश सोडण्यामागे काही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर कारणे समोर आली आहेत:
संधींचा अभाव: देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही अनेक खेळाडूंना वरिष्ठ संघात किंवा आयपीएलमध्ये योग्य स्थान मिळत नाही.
अंतर्गत राजकारण: बऱ्याचदा खेळाडू स्थानिक क्रिकेटमधील राजकारणाचे बळी ठरतात, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो.
आर्थिक आणि मानसिक स्थैर्य: जेव्हा आयपीएलच्या लिलावात खेळाडू दुर्लक्षित राहतात, तेव्हा त्यांचे आर्थिक गणित बिघडते आणि ते मानसिक नैराश्यात जातात. अशा वेळी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी परदेशी लीगमध्ये खेळणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.