WI vs IND, 2nd T20I: तिलक वर्माने पहिले T20 अर्धशतक ठोकून रचला इतिहास, ऋषभ पंतचा 5 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!

Tilak Varma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले.
Tilak Varma
Tilak VarmaDainik Gomantak
Published on
Updated on

WI vs IND, 2nd T20I: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिका (IND vs WI) खेळत आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाने कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली, मात्र टी-20 मालिकेची सुरुवात पराभवाने झाली.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. तिलकने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या, ज्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात मदत झाली.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तिलकने 41 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.

तिलकचे हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे. या अर्धशतकासह त्याने इतिहास रचला. त्याने भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा पाच वर्षे जुना विक्रम मोडला.

दरम्यान, मेन्स T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा तिलक हा दुसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. वयाच्या 20 वर्षे 71 दिवसात त्याने ही कामगिरी केली. त्याचवेळी, पंतने वयाच्या 21 वर्षे आणि 38 दिवसात टी-20 मध्ये अर्धशतक ठोकले होते.

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानावर आहे. तिलकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने 39 धावा काढल्या होत्या.

तिलक हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या दोन डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने दोन सामन्यांत 90 धावा काढल्या आणि सूर्यकुमार यादवला मागे टाकले. सूर्याने पहिल्या दोन सामन्यात 89 धावा केल्या होत्या.

Tilak Varma
WI vs IND, 2nd T20I: विराट-रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची सूर्याला सुवर्णसंधी, 'हे' अनोखे शतक ठोकणार का?

दुसऱ्या T20 बद्दल बोलायचे झाल्यास, गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल 7 आणि सूर्यकुमार यादव 1 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. सूर्या धावबाद झाला.

यानंतर इशान किशन (27) आणि तिलक यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. वर्मा 16 व्या षटकात अकिल हुसेनचा बळी ठरला. संजू ससमॅनची (7) बॅट शांत राहिली. कर्णधार हार्दिक पांड्याने 24 आणि अक्षर पटेलने 14 धावांचे योगदान दिले.

भारताने (India) 20 षटकात 7 गडी गमावून 152 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अक्वेल, अल्झारी जोसेफ आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com