Asia Cup 2023: भारतीय चाहत्यांची निराशा, भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना पावसामुळे रद्द

Asia Cup 2023: आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला सामना पावसामुळ रद्द करण्यात आला.
Stadium
StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023: आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला सामना पावसामुळ रद्द करण्यात आला.

इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्व गडी गमावून 266 धावा केल्या होत्या.

भारताचा डाव संपल्यानंतर लगेचच पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरु होऊ शकला नाही.

पंचांनी 9 वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर पाकिस्तानला सुधारित लक्ष्य मिळाले होते. पाकिस्तानला 36 षटकात 226 धावा करायच्या होत्या. मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.

दरम्यान, डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार षटक आणि टार्गेट कमी करुन सामना पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सामन्यानंतर पाकिस्तान (Pakistan) आशिया चषकाच्या सुपर 4 साठी पात्र ठरला आहे. तर भारतीय संघाचा पुढील सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे.

आशियातील दोन मोठे संघ 4 वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात एकमेकांशी भिडले होते. अशा स्थितीत या सामन्याची सर्वजण बराच वेळ वाट पाहत होते, मात्र पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नाही.

दुसरीकडे, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या, मात्र युवा फलंदाज इशान किशनची शानदार खेळी पाहायला मिळाली.

रोहित 11 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला. यानंतर विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर टीकू शकला नाही. तो सात चेंडूत चार धावा करुन बाद झाला. सुमारे 5 महिन्यांनंतर पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, परंतु त्याला 9 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या.

शुभमन गिलने 10 धावा केल्या. यानंतर इशान किशन (Ishan Kishan) आणि हार्दिक पांड्या यांच्यात पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची भागीदारी झाली. इशान किशनने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.

हार्दिक 90 चेंडूत 87 धावा करुन बाद झाला. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने चार, हरिस रौफ आणि नसीम शाहने प्रत्येकी तीन बळी घेतले.

इशान किशनची ऐतिहासिक खेळी

इशान किशन फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाने 48 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. पण संघाच्या डावाची धुरा सांभाळत इशान किशनने 54 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

इशान किशनचे हे वनडेतील सलग चौथे अर्धशतक ठरले. यापूर्वी, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com