IND vs SA: प्लेइंग-11, गोलंदाजी अन् केएल राहुलचे यष्टीरक्षण; कसोटी मालिकेपूर्वी रोहितने मांडले 5 महत्त्वाचे मुद्दे

Rohit Sharma: द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यावेळी त्याने मांडलेल्या 5 महत्त्वाचे मुद्द्यांचा आढावा.
Rohit Sharma
Rohit SharmaPTI

Rohit Sharma Press Conference ahead of South Africa vs India Test Series :

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला मंगळवारपासून (26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला खेळवला जाणार आहे. त्यानंतर ३ जानेवारीपासून दुसरा सामना केपटाऊनला होणार आहे.

ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचाही भाग आहे. त्याचमुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. याच मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

दक्षिण आफ्रिकेतील आव्हान

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेत आत्तापर्यंत एकदाही भारताला कसोटी मालिका जिंकता आलेली नसल्याचे अधोरेखीत करत म्हटले की इथे जिंकायला आवडेल. त्याचबरोबर त्याने दक्षिण आफ्रिकेत कसोटीत येणाऱ्या आव्हानांबद्दलही भाष्य केले.

तो म्हणाला, हे मोठे आव्हान आहे. जेव्हाही आम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेला जातो, तेव्हा आव्हानच असते. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांचे वर्चस्व असते. गोलंदाजांना येथे स्विंग आणि सीमही मिळते. जसजसे खेळपट्टीला तडे जातात आणि चेंडूला अनियमित उसळी मिळते, तशी खेळपट्टी खेळण्यासाठी कठीण होते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असणे चांगले असेल.'

Rohit Sharma
Rohit Sharma: T20I वर्ल्डकप खेळणार का? कर्णधार रोहित म्हणाला, 'लवकरच...'

तसेच या मालिकेतील विजय वर्ल्डकप 2023 पराभवाचे दु:ख फार कमी करणार नसले, तरी येथील विजय खास असेल, असेही रोहित म्हणाला.

तो म्हणाला, 'आम्ही येथे कधीही मालिका जिंकलेलो नाही, त्यामुळे जर आम्ही विजय मिळवला, तर मोठी गोष्ट असेल. मला माहित नाही की यामुळे वर्ल्डकप पराभवाचे दु:ख कमी होईल की नाही. जर आपण जिंकू शकलो, तर नक्कीच ही चांगली गोष्ट असेल. इतकी मेहनत केली आहे, तर काहीतरी तर मिळाले पाहिजे.'

शमीची कमी भासेल

वेगवान गोलंदाज या मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे सांगताना रोहितने सांगितले की मोहम्मद शमीचीही कमी भासेल. शमी दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकलेला नाही.

रोहित म्हणाला, 'आमच्यासाठी ही मालिका खूप मोठी संधी आहे. आम्ही इथे मालिका जिंकण्यासाठी गेल्या दोन दौऱ्यात खूप जवळ होतो. त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे.'

'आमच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत खूप चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाजांनी त्यांची प्रतिभा दाखवली आहे. शमीची कमी नक्की भासेल. त्याने गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. त्याची जागा भरून काढावी लागणार आहे, जे सोपे नसेल.'

Rohit Sharma
SA Vs IND: 31 वर्षे, 9 मालिका! टीम इंडियाला एकही विजय मिळाला नाही; हिटमॅनकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

फिरकी गोलंदाजीही महत्त्वाची

रोहितने असेही म्हटले की दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहत असले, तरी फिरकी गोलंदाजीही महत्त्वाची असते.

रोहित म्हणाला, 'प्रत्येक गोलंदाजाची महत्त्वाची भूमिका आहे, फिरकीपटूंची देखील. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही येथे येता, तेव्हा वेगवान गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे फिरकीपटूंना दुय्यम भूमिका असते. पण कधीकधी जेव्हा खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते, तेव्हा वेगवान गोलंदाजी जास्त होते. त्यावेळी फिरकीपटू धावा रोखू शकतात किंवा एखादी विकेट घेऊ शकतात किंवा फलंदाजावरील दबाव वाढवू शकतात.'

त्याचबरोबर रोहित असेही म्हणाला की संघात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे फिरकीपटू असून त्यांना त्यांना फार काही सांगावे लागत नाही. त्यांना कशी गोलंदाजी करायची हे माहित आहे. तसेच ते आक्रमक असून विकेट घेण्याचा प्रयत्न करतात.

प्लेइंग इलेव्हन 75 टक्के निश्चित

प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना रोहितने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची जागा निश्चित असल्याचे संकेत देताना प्रसिध कृष्णा किंवा मुकेश कुमार यांच्यातील एकाला संधी मिळेल, असे म्हटले.

तो म्हणाला, 'मुकेश आणि प्रसिध यांच्यातील एकाची निवड करणे कठीण असेल. आम्हाला संघाची गरज काय आहे आणि खेळपट्टी कशी आहे, हे पाहावे लागेल. मी राहुल द्रविड आणि केएल राहुलशी आमच्या गेल्या दौऱ्याबद्दल बोललो आहे.'

'राहुलने मागच्यावेळी सेच्युरियनमध्ये शतकही ठोकले होते. त्यामुळे मी त्याला खेळपट्टी कशी आहे, याबद्दलही विचारले. त्याने मला त्याची प्रतिक्रिया दिली आहे आणि माझ्या डोक्यातही काय करता येईल, याबद्दल विचार घोळत आहेत.'

'आमच्याकडे बुमराह आणि सिराज आधीत आहेत. आता आम्हाला कोणाला निवडायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. 75 टक्के सर्व निश्चित आहे, फक्त आता 25 टक्के गोष्टी संघाच्या बैठकीत निश्चित होतील.'

Rohit Sharma
SA vs IND: आता रंगणार कसोटीचा थरार! विराट-रोहितचे कमबॅक, टीम इंडियाचा कसून सराव, पाहा Video

केएल राहुल चांगला यष्टीरक्षक - रोहित

या मालिकेत केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. याबद्दलही रोहितने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'त्याने वर्ल्डकपमध्ये चांगले यष्टीरक्षण केले होते. त्याने खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे आम्हाला मधल्या फळीत एक चांगला फलंदाज खेळवण्याचा पर्याय उपलब्ध होतो. त्याने वनडेत मधल्या फळीत फलंदाजी करताना अनेक गोष्टी योग्य केल्या.'

'तो परिस्थिती ओळखतो आणि त्याला कशी फलंदाजी करायची हे माहित आहे. त्याला किती काळ यष्टीरक्षण करायचे आहे, हे माहित नाही; पण जोपर्यंत तो करेल, तोपर्यंत तो चांगले यष्टीरक्षण करेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com