Mumbai Indians: कॅप्टन बदलताच मुंबईने लाखो फॉलवर्स तर गमावलेच, पण संघातही पडली फुट? सूर्याच्या पोस्टने चर्चा

Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पंड्याची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूर्यकुमारने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai Indians
Mumbai Indians

Mumbai Indians lost lakhs of Followers after Hardik Pandya replaces Rohit Sharma as captain:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेपूर्वी अनेक मोठे बदल मुंबई इंडियन्स संघात घडताना दिसत आहेत. गेली 10 वर्षे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माने सांभाळली होती. पण आता आयपीएल 2024 स्पर्धेआधी मुंबईने शुक्रवारी (15 डिसेंबर) नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई इंडियन्सने अष्टपैलू हार्दिक पंड्याला कर्णधार केले आहे. विशेष म्हणजे काहीदिवसांपूर्वीच हार्दिकला मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत संघात घेतले होते.

हार्दिकने गेली दोन हंगाम गुजरातसाठी आयपीएल सामने खेळले होते. दोन्ही हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात अंतिम सामन्यातही पोहचले होते, एकदा विजेतेपद जिंकले होते, तर एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

यानंतर आता पुन्हा हार्दिक मुंबई संघात परतला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हार्दिकने 2015 ते 2021 दरम्यान मुंबईकडूनच आयपीएल खेळले होते.

फॉलोवर्स गमावले

दरम्यान, चाहत्यांना मात्र रोहितच्या जागेवर हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देणे पसंत पडले नाही. अनेक चाहत्यांनी या निर्णयावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर या निर्णयानंतर एका दिवसातच सोशल मीडियावरही लाखोंच्या संख्येने मुंबई इंडियन्सचे फॉलोवर्स कमी झाले आहेत.

रोहितने गेल्या 10 वर्षात 5 वेळा मुंबई इंडियन्स संघाला कर्णधार म्हणून विजेतेपद जिंकून दिले आहे. अशात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचमुळे त्याला संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हा चाहतावर्ग निराश झाल्याचे दिसले असून मुंबई इंडियन्स फ्रँचायझीवर टीका करताना सोशल मीडियावर दिसत आहे.

सूर्याची पोस्टही चर्चेत

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला नवा कर्णधार म्हणून नेमल्यानंतर लगेचच शनिवारी (१६ डिसेंबर) सकाळी सूर्यकुमार यादवने तुटलेल्या हार्टचा एक इमोजी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्याबद्दल चर्चा होत आहे.

दरम्यान, सूर्यकुमारने अशी पोस्ट का केली, याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, अनेक सोशल मीडिया युजर्सने या पोस्टचा संबंध हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याशी जोडला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मुंबई इंडियन्सने जेव्हा हार्दिकला ट्रेड करून संघात घेतले होते, त्यानंतर जसप्रीत बुमराहने इंस्ट्राग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की 'मौन हे कधीकधी सर्वोत्तम उत्तर असते.' या पोस्टमुळे देखील अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या होत्या.

आता सूर्यानेही पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूर्यकुमार आणि बुमराह हे खेळाडू देखील गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहेत. तसेच रोहितनंतर त्यांच्यापैकी एकाला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी दिल्याने चाहते नाराज आहेत.

दरम्यान, यातील कोणत्याच गोष्टीवर सूर्यकुमार, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांच्याकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com