MS Dhoni Cries: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला MS धोनी अखेरचा विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीत निळ्या जर्सीत दिसला होता. त्याच्या कारकिर्दीचा शेवट म्हणावा तसा झाला नाही.
या सामन्यात तो धावबाद होणे दुर्दैवी ठरले आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे तत्कालीन बॅटिंग कोच संजय बांगर यांनी या मॅचनंतर सर्व खेळाडू ढसाढसा रडल्याविषयी सांगितले होते. त्यांनी धोनीबद्दल सांगितले की, 'तो खूप रडला होता.' यावर आता खुद्द माहीनेच उत्तर दिले आहे.
दरम्यान, कॅप्टन कूल गुरुवारी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी चाहत्यांनी त्याला संजय बांगर यांच्या त्या खुलाशाबद्दल विचारले.
याबाबत धोनी म्हणाला की, संघ जेव्हा जवळचा सामना हरतो तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते. या इव्हेंटमध्ये माहीने त्याच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबाबत आणि फिटनेसबाबतही सांगितले. यामुळे त्याच्या आयपीएल 2024 मध्ये पुन्हा खेळण्याचे संकेत मिळाले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, धोनी शेवटचा सामना 2019 मध्ये खेळला होता, परंतु त्याने 15 ऑगस्ट 2020 च्या संध्याकाळी त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) पोस्टद्वारे सर्व चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. सध्या तो आयपीएलमध्ये खेळतोय.
बांगर यांच्या खुलाशांवर धोनी म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही जवळचे सामने गमावता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी प्रत्येक सामन्यासाठी माझा प्लॅन तयार ठेवतो आणि टीम इंडियासाठी (Team India) मी खेळलेला तो शेवटचा सामना होता. तुम्हाला माहित आहे की, तुम्ही पुन्हा ते स्थान मिळवू शकणार नाही, अशा परिस्थितीत भावनांवर तुमचे नियंत्रण राहत नाही.'
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने 2007 टी-20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याची कारकीर्द यशाने भरलेली होती. त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.