IND vs ENG: स्टोक्सच्या 100 व्या कसोटीत भारताचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडला 434 धावांनी पराभूत करत मालिकेतही आघाडी

India vs England 3rd Test: भारतीय संघाने राजकोट कसोटीत 434 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेतही आघाडी घेतली आहे.
Team India
Team IndiaAFP

India vs England, 3rd Test at Rajkot:

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध राजकोटला झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल 434 धावांनी रविवारी (18 फेब्रुवारी) विजय नोंदवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, भारताने 434 धावांनी विजय मिळवल्याने हा भारताचा कसोटीतील धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय ठरला.

या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 557 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या दीड सत्रातच इंग्लंडचा दुसरा डाव 39.4 षटकात 122 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने चौथ्याच दिवशी विजयाची नोंद केली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना होता. मात्र त्याला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Team India
IND vs ENG: कुलदीप-गिलचा उडाला गोंधळ अन् सेंच्युरीसाठी 9 धावांची गरज असताना स्टोक्सने केलं रनआऊट

इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्रावली यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र डकेटला 7 व्या षटकात मोहम्मद सिराज आणि ध्रुव जुरेलने मिळून 4 धावांवरच धावबाद केले. त्यानंतर मात्र इंग्लंडने नियमित अंतराने विकेट गमावल्या.

झॅक क्रावली 11 धावांवर बाद झाला. तर ऑली पोप (3), जो रुट (7) आणि जॉनी बेअरस्टो (4) यांना रविंद्र जडेजाने स्वस्तात माघारी धाडले.

त्यानंतर बेन स्टोक्सलाही (15) कुलदीप यादवने फार वेळ टिकू दिले नाही. बेन फोक्सचाही (16) अडथळाही जडेजाने दूर केला, तर रेहान अहमदला (0) सिराजने माघारी धाडले. टॉम हर्टलीला अश्विनने 16 धावांवर त्रिफळाचीत केले. अखेरीस आक्रमक खेळणाऱ्या मार्क वूडला जडेजाने बाद करत पाच विकेट्स पूर्ण केल्या. वूडने 15 चेंडूत 33 धावा केल्या.

भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Team India
IND vs ENG: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अश्विन पुन्हा झाला संघात सामील, चौथ्या दिवशी उतरणार मैदानात

तत्पुर्वी, भारताने पहिल्या डावात 130.5 षटकात सर्वबाद 445 धावा उभारल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने 131 धावांची खेळी केली, तर रविंद्र जडेजाने 112 धावा केल्या. तसेच सर्फराज खानने 67 धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 71.1 षटकात सर्वबाद 319 धावांत संपला. त्यामुळे भारताने 126 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडकडून बेन डकेटने 153 धावांची खेळी केली. तसेच बेन स्टोक्सने 41 धावांची खेळी केली. याशिवाय कोणाला खास काही करत आले नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारताने दुसरा डाव 98 षटकात 4 बाद 430 धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावात घेतलेल्या 126 धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले.

दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालने 214 धावांची नाबाद खेळी केली. तसेच शुभमन गिलने 91 धावा केल्या आणि सर्फराज खानने 68 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जो रुट, टॉम हर्टली आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com