Arshdeep Singh: 'इतनी नो-बॉल फेक देंगे...', भारत-श्रीलंका दुसऱ्या टी20 नंतर मीम्सचा पाऊस

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी२० नंतर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
India vs Sri Lanka T20I memes viral
India vs Sri Lanka T20I memes viralDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

श्रीलंकेने हा सामना जिंकल्याने मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

हे मीम्स बरेच भारतीय संघाकडून टाकण्यात आलेल्या नो-बॉल्सवरील होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तब्बल 7 नो-बॉल टाकताना 30 पेक्षाही अधिक धावा दिल्या. या 7 नो-बॉलपैकी 5 नो-बॉल तर एकट्या अर्शदीप सिंगने टाकल्या होत्या. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात सलग तीन नो-बॉल टाकले होते.

तसेच उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ नो-बॉल टाकला. त्यामुळे नो-बॉल हे भारताच्या पराभवाच्या मुख्य कारणांपैकी एक ठरले. याबद्दल अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनका, भारताचे सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांचे कौतुकही झाले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण श्रीलंकेने चांगली फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 206 धावा केल्या. श्रीलंकेकडून सलामीवीर कुशल मेंडिसने 31 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार दसून शनकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या.

तसेच सलामीवीर पाथम निसंका 33 आणि चरिथ असलंका 37 यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने 2 आणि युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 207 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताने 57 धावांवरच 5 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या 91 धावांच्या भागीदारीने भारताचे आव्हान राखले होते. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताला 207 धावांचे आव्हान पार करता आले नाही.

भारताचा संघ 20 षटकात 8 बाद 190 धावाच करू शकला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 31 चेंडूत 65 धावा केल्या. तसेच सूर्यकुमारने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून कसून रजिता, दसून शनका, दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर चमिका करुणारत्ने आणि वनिंदू हसरंगा यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com