WI vs IND, 3rd ODI: भारताचा मालिका विजय! फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी उडवली विंडिजची दाणादाण

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजला तिसऱ्या वनडेत पराभूत करत मालिकेवरही कब्जा केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

West Indies vs India, 3rd ODI: भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (1 ऑगस्ट) वेस्ट इंडिजला वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 200 धावांनी पराभूत केले. त्रिनिदादला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारताने ३ सामन्यांची वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी तब्बल 352 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला.

Team India
WI vs IND 3rd ODI: इशान किशन आणि शुभमन गिल जोडीचा मोठा कारनामा, गब्बर-रहाणेचा मोडला रेकॉर्ड!

या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजला मुकेश कुमारने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्याने ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्स या सलामीवीरांच्या जोडीला माघारी धाडले. तसेच कर्णधार शाय होपलाही त्याने 5 धावांवरच बाद केले.

नंतरच्या विकेट्स जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी स्वस्तात घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. तरी अलिक अथानाझने 32 धावा करत एक बाजू सांभाळली होती. पण त्यालाही कुलदीपने त्रिफळाचीत केले.

तसेच अखेरीस अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी 9 व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करत कसेबसे वेस्ट इंडिजला 140 धावांचा टप्पा पार करून दिला.पण अल्झारीला 26 धावांवर शार्दुलने बाद केले. त्यानंतर जेडेन सील्सही 1 धावेवर बाद झाला आणि वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. गुडाकेश 39 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमारने ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि जयदेव उनाडकटने 1 विकेट घेतली.

Team India
WI vs IND 3rd ODI: 10 वर्षांपासून दुर्लक्षित खेळाडूला पांड्यानं हेरलं! टीम इंडियात दिली संधी

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दले. त्यानुसार प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. या दोघांनीही अर्धशतके झळकावताना 143 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी इशानला यानिक कॅरियाने बाद केल्याने तुटली.

इशान 64 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाडही ८ धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर शुभमन गिलला संजू सॅमसनने आक्रमक खेळत चांगली साथ दिली. त्यानेही अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 41 चेंडूत 51 धावा केल्या.

त्यानंतर गिल 92 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. पण, त्यानंतरही कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजीची लय कायम ठेवली. त्याला सूर्यकुमारची साथ मिळाली. हार्दिकनेही अर्धशतक झळकावले. पण सूर्यकुमार यादव 35 धावा करून बाद झाला. पण तोपर्यंत भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडला होता.

अखेरीस हार्दिकच्या फटकेबाजीमुळे भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. हार्दिक 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 70 धावांची नाबाद खेळी केली. रविंद्र जडेजा 8 धावांवर नाबाद राहिला.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने 2 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com