Mumbai Indians Playoff Equation: लखनऊ विरुद्ध पराभवाने मुंबईने गमावली सुवर्णसंधी? आता असं बदललं समीकरण
IPL 2023 playoffs equation for Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात अखेरच्या षटकात लखनऊने 5 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर मुंबईसमोरील प्लेऑफची शर्यत आता कठीण झाली आहे.
खरंतर हा सामना जिंकून मुंबईला गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवण्याची संधी होती. पण ही सुवर्णसंधी मुंबईने गमावली आहे. आता मुंबई देखील 16 गुणच मिळवू शकणाऱ्या संघांच्या पंक्तीत सामील झाली आहे.
मुंबईने आत्तापर्यंत 13 सामने खेळले असून 7 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आता 14 गुण आहेत. त्याचबरोबर लखनऊच्या विजयामुळे सध्या मुंबई गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरले आहे, तर लखनऊने 15 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.
सात संघात शर्यत
आता आयपीएल 2023 गुणतालिका पाहिली, तर गुजरात टायटन्स अव्वल क्रमांकावर असून त्यांचे 13 सामन्यांनंतर 18 गुण आहेत. तसेच त्यांनी अव्वल स्थानावर कब्जा केला आहे, कारण अन्य कोणतेच 9 संघ 18 गुणांपर्यंत पोहोचणार नाही.
त्यानंतर 15 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि लखनऊ हे दोनच असे संघ आहेत, जे 17 गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी मुंबईव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांकडेही आहे.
त्याचबरोबर जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स पोहचू शकतात. हे संघच सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. अन्य दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आलेले आहे.
मुंबईसमोरील समीकरणे
मुंबईला आता अखेरचा सामना रविवारी (21 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यानंतरही मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.
जर मुंबईने हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या त्यांच्या उर्वरित दोन सामन्यातील एक जरी सामना पराभूत झाला असेल, तर मुंबई थेट प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण, जर बेंगलोर आणि पंजाब यांनी त्यांचे दोन्ही सामने जिंकले, तर मात्र मुंबईला त्यांच्यापेक्षा जास्त नेट रन रेट ठेवावा लागणार आहे.
याशिवाय जर मुंबईने हैदराबादविरुद्धचा सामना पराभूत झाला, तरी मुंबईला प्लेऑफची संधी असेल. पण त्यासाठी मुंबईला आशा करावी लागेल की पंजाब आणि बेंगलोरने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने पराभूत व्हावेत आणि राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स हे संघही 14 गुणांपर्यंत पोहचू नयेत किंवा पंजाब, बेंगलोर, राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील कोणीही 14 गुणांपर्यंत पोहचले, तरी त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी राहावा.
मुंबईला दुसरा क्रमांक मिळवण्याचीही संधी
दरम्यान, मुंबईला दुसरा क्रमांक मिळवण्याचीही संधी आहे. जर मुंबईने हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला, तर मुंबई 16 गुणांपर्यंत पोहोचेल. तसेच जर पंजाब आणि बेंगलोर यांनी एक जरी पराभव आणखी स्विकारला आणि चेन्नई व लखनऊ या संघांनी त्यांचा अखेरचा साखळी सामना पराभूत झाला, तर मुंबई सहज दुसऱ्या क्रमांकावर कब्जा करू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.