
India Squad for World Cup 2023:
भारतात 5 ऑक्टोबरपासून 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारताचा संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याची उत्सुकता अनेक चाहत्यांना आहे. आता याचबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निश्चित झाला असल्याचे सध्या समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समीतीने शनिवारी (2 सप्टेंबर) रात्री आगामी वनडे वर्ल्डकपसाठी 15 जणांच्या संघाची निवड केली आहे.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. याचदरम्यान निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकर श्रीलंकेत पोहचला असून त्याने शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली. त्यानंतर वर्ल्डकपसाठी संघ निश्चित केला आहे.
दरम्यान, वर्ल्डकपसाठी निवडलेल्या १५ जणांच्या संघात केएल राहुलला संधी मिळाल्याचे समजत आहे. तो दुखापतीमुळे गेले साडेतीन महिने क्रिकेटपासून दूर होता. आयपीएल खेळताना झालेल्या दुखापतीनंतर मे महिन्यात त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया झाली होती.
परंतु, आता तो या दुखापतीतून पूर्ण सावरला आहे. तसेच मेडिकल टीमनेही केएल राहुल फिट असल्याचे सांगितले आहे. तो सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये सराव करत असून लवकरच आशिया चषकासाठी भारतीय संघात सामील होईल.
तथापि, आशिया चषकासाठी भारतीय संघाबरोबर असलेल्या संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वर्ल्डकपसाठी संधी मिळालेली नसल्याचे समजत आहे. तसेच युजवेंद्र चहल यालाही संधी मिळालेली नाही. चहलला आशिया चषकातही संधी मिळालेली नाही.
वर्ल्डकपसाठी फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी मिळाली आहे, तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे देखील फिरकी गोलंदाजीसाठी पर्याय असतील. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांचे पर्याय असतील.
त्याचबरोबर केएल राहुलसह यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनने जागा मिळवली आहे. तसेच कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. त्याच्यासह संघात शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाज असतील.
दरम्यान, अजित अगरकरने यापूर्वी सांगितले होते की 5 सप्टेंबरनंतर वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली जाईल. मात्र राहुलला मेडिकल टीमने खेळण्याची परवानगी दिल्याने आधीच बैठक झाली आणि संघ निश्चित करण्यात आल्याचे समजत आहे.
पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण यजमानपद भारताकडे आहे. यापूर्वी भारतात 1987, 1996 आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचे सामने झाले होते. पण त्यावेळी भारत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह संयुक्त यजमान होते. पण यंदा केवळ भारतीय संघाकडे यजमानपद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.