IND vs NZ, 1st T20I: केवळ अर्शदीपचे षटकच नाही, तर भारताच्या पराभवाची 'ही' आहेत 4 कारणे

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात कराव्या लागलेल्या पराभवाच्या कारणांचा घेतलेला आढावा.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारी टी20 मालिकेतील टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात न्यूझीलंडने डेवॉन कॉनवे (52) आणि डॅरिल मिशेल (59) यांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Team India
IND vs NZ, 1st T20I: भारताच्या सुंदरचे अर्धशतक व्यर्थ, रांचीत न्यूझीलंडने फडकवली विजयी पताका

त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. त्याने मधल्या षटकांदरम्यान हार्दिक पंड्याबरोबर 68 धावांची भागीदारीही केली होती.

मात्र यांच्याशिवाय अन्य कोणी खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 155 धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल, कर्णधार मिशेल सँटेनर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, न्यूझीलंडने भारताला भारतात तब्बल 5 वर्षांनी टी20 सामन्यात पराभूत केले आहे. भारताच्या पराभवामागे नक्की काय कारणे आहेत, याकडे एक नजर टाकू.

(4 Reasons India Lost The First T20I against New Zealand)

1. खेळपट्टीचा स्वभाव ओळखण्यात अपयशी - भारताने ज्यावेळी या सामन्यात नाणेफेक जिंकली, त्यावेळी हार्दिक पंड्याने खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असल्याचे म्हटले होते. तसेच दवही पडेल असे म्हटले होती. मात्र, प्रत्यक्षात खेळपट्टीवर फिरकीपटू गोलंदाजांना अधिक मदत मिळाली.

मात्र, या सामन्यासाठी भारताने केवळ वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंना संधी दिली होती. तसेच दीपक हुडाचा पार्ट टाईम फिरकीपटू म्हणून एक पर्याय होता. मात्र भारताने युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जर भारताने एक ज्यादाचा वेगवान गोलंदाज खेळवण्याऐवजी चहलला संधी असती, तर फायदा होऊ शकला असता.

2. अर्शदीपचे अखेरचे षटक

भारताकडून 20 वे षटक अर्शदीप सिंगने टाकले. मात्र हे षटक भारतासाठी खूपच महागात पडले. कारण अर्शदीपने या षटकात एका नोबॉलसह तब्बल 27 धावा दिल्या. त्याच्या या षटकात न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने सलग 3 षटकार ठोकले होते. हेच एक षटक भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.

Team India
IND vs NZ, 1st T20I: हवेत झेपावत वॉशिंग्टनने पकडला 'सुंदर' कॅच, पाहा Video

3. वरच्या फळीचे अपयश

भारतीय संघाची वरची फळी चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरली. भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि ईशान किशन अनुक्रमे 7 आणि 4 धावा करून बाद झाले. तसेच राहुल त्रिपाठी शुन्यावर बाद झाला. त्यामुळे भारताने पहिल्या तिन्ही विकेट्स 15 धावांवरच गमावल्या होत्या. ज्यामुळे भारताच्या मधल्या फळीवर दबाव आला.

4. मोठी भागीदारी करण्यात अपयश

या सामन्यात वरची फळी लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली होती. पण या दोघांच्या भागीदारीव्यतिरिक्त भारताकडून कोणालाही मोठी भागीदारी करता आली नाही.

सूर्यकुमार आणि हार्दिक हे देखील चार चेंडूंच्या अंतरात बाद झाले. त्यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 50 धावांची खेळी केली मात्र, त्यालाही कोणाची भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे अखेरीस भारताला 21 धावा कमी पडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com