श्री श्री रविशंकर
श्री श्री रविशंकरDainik Gomantak

सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी पंचसूत्री अंगीकारावी

प्रत्येक शहरात गोशाळा आवश्यकच: श्री श्री रविशंकर यांचे मत

पुणे: बदलत्या परिस्थितीत समाजिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असून, ते योग्य करण्यासाठी नशेबाजी रोखण्याबरोबर जलस्रोत बळकट करणे, वृक्षारोपण, नैसर्गिक शेती आणि गोसंगोपन ही पंचसूत्री अवलंबली पाहिजे. गोसंगोपनासाठी प्रत्येक शहरात गोशाळा आवश्यकच आहे, असे ठाम मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आज देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. यानिमित्ताने श्री श्री रविशंकर यांच्याशी सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी संवाद साधला. श्री श्री रविशंकर यांनी देशी गोवंश, शांती, मैत्री आणि समृद्धी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पितृ पंधरवड्याच्या सांस्कृतिक महत्त्वाबाबत श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तुमच्याकडे केवळ आर्थिक समृद्धी असून उपयोग नाही, तर मनःशांतीही महत्त्वाची असते. तणावमुक्त जीवनच सुखी जीवनाचा पाया आहे. समृद्धी व शांती एकमेकांना पूरक आहे. आपण केवळ पूर्वजांमूळे या भूतलावर आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांच्याप्रति ‘तर्पण’ करणे म्हणजे, श्रद्धांजली अर्पण करणे होय. पूर्वजांनी सांगितलेल्या नियमांचे आचरण केल्यास मनःशांती मिळेल. आपण त्यांच्याकडून आशीर्वाद मागत असतो. भारताप्रमाणे चीन, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, सिंगापूर येथेही याच पद्धतीची प्रथा वेगळ्या प्रकारे पाळली जाते. प्रियजनांच्या स्मरणार्थ ही परंपरा आहे.’’

समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांबद्दल शंका उपस्थित केल्या जातात. ही परिस्थिती कशी बदलता येईल या श्री. पवार यांच्या प्रश्‍नावर श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘शंकेचे तीन प्रकार असतात. स्वतःवर शंका असणे, लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणे आणि तिसरा प्रकार देवाच्याच अस्तित्वावर शंका घेणे. देवाला आपण प्रत्यक्ष पाहत नसल्याने त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतो. अनेकदा आपली जवळच्या लोकांकडून फसवणूक झाल्याने लोकांच्या प्रामाणिकपणावर शंका येते. यातून स्वतःवर शंका घ्यायला लागतो. स्वतःवरील शंका घेणे बंद केले पाहिजे. आत्मविश्वासाने स्वतःकडे पाहावे. स्वतःवरील विश्वास कायम ठेवल्यास दुसऱ्याबद्दल कधीही शंका निर्माण होणार नाहीत.’’

प्रत्येक शहरात गोशाळा असलीच पाहिजे, असे ठाम मत व्यक्त करत ते म्हणाले, ‘‘अनेक शहरातील मोकळ्या जागांत क्राँक्रिटची जंगले उभी राहत आहेत, त्याऐवजी गोशाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. शहरात गोसंगोपनाबरोबर नक्षत्रवनांचीही उभारणी केली पाहिजे. त्यातून समाज आणि निसर्ग या दोघांचेही संवर्धन होईल.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com