Goa Beach: समुद्राचे ऐकावेच लागेल

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर गोळा केलेल्या कचऱ्याच्या नमुन्यावरून आढळून आले आहे की त्‍यातल्या बहुतेक साऱ्या वस्तू घरगुती वापराच्या होत्या.
Goa Beach | Goa News
Goa Beach | Goa NewsDainik Gomantak

पाऊस पाणी कसं आहे? या प्रश्‍नाचं उत्तर, हल्ली गोव्यात (Goa) तुम्ही कुठे राहता त्याच्यावर अवलंबून आहे. पाऊस तर अगदी आक्रमक होऊन गेले दोन दिवस बरसतो आहे. तुम्ही खाण क्षेत्रात रहात असाल तर वरील प्रश्‍नाचे उत्तर असेल- ‘पावसाचं ठीक आहे पण त्यामुळे खाणींमध्ये जे पाणी साठलेले आहे ते देवाच्या कृपेने तिथून मोकळे मात्र होऊ नये.’ (Goa News In Marathi)

जर तुम्ही पणजीत (Panaji) रहात असाल तर आपले नाक पकडून तुम्ही दिलेले उत्तर असेल- ‘रस्त्यावर साचलेल्या पाण्यापैकी पावसाचे कुठले आणि मलनिस्सारणाचे पाईप तुंबून वर आलेले कुठले हेच कळेनासे झालेले आहे.’ आणि तुम्ही किनारी भागात रहात असाल तर उत्तर असेल- ‘हा समुद्र तरी कुठवर सोसणार? जे आम्ही त्याच्यात नेऊन ओतले होते. तेच तर त्याने परत केले आहे.’ (Goa News)

Goa Beach | Goa News
Goa Waterfall: धबाबा लोटती धारा ...

आपण ज्याला ‘विकास विकास म्हणत भुई धोपटतो आहोत, त्या विकासाचा (Development) दर्जा आणि त्याचे प्रमाण रुद्र होऊन कोसळणारा पाऊस अगदी नि:पक्षपातीपणे दाखवतो. खाणपट्ट्यात वसलेल्यांना तो भयाच्या काठावर उभे करतो. शहरात वसलेल्यांच्या श्‍वासाशी आलेल्या दुर्गंधीला रोखण्यासाठी तो त्यांना नाक धरायला लावतो. आम्ही दृष्टिआड करण्यासाठी फेकून दिलेल्या कचऱ्याचे तो किनाऱ्याच्या काठाने कठोरपणे प्रदर्शन मांडतो.

गोव्याला (Goa) सुमारे 110 किलोमीटरचा सुंदर समुद्रकिनारा (Beach) लाभला आहे. या इतक्या दीर्घ लांबीच्या किनाऱ्यावर पावसाळ्यातल्या (Monsoon) लाटांनी जे अभद्र आणून टाकले आहे ते पाहता आमच्याच व्यवस्थेचे समुद्राने काढलेले ते वाभाडे आहेत हे स्पष्ट दिसते. वाळूचा समुद्र किनारा त्या काळात विद्रूप प्लास्टीकचा किनारा बनून जातो. पावसाळ्यात गोव्यातल्या किनाऱ्यांची स्थिती कशी असते हे गेल्या काही दिवसातली वर्तमानपत्रे (News Paper) उघडून पाहिली तरी त्याची कल्पना आम्हाला येऊ शकेल.

हल्लीच गोव्याच्या किनाऱ्यावर ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कोची’(Central Marine Fisheries Research Institute Kochi) यांनी केलेल्या संशोधनातून हे बाहेर आले आहे की अशाप्रकारचा कचरा आता किनारी पर्यावरणाचा भागच बनलेला आहे. पर्यटनांबरोबरच (Tourist) किनारी शहरीकरणाने देखील हे प्रदूषण घडवून आणण्यात आपला हातभार लावलेला आहे. किनारी कचरा अनेक पातळ्यांवर हानी करतो.

प्रथम, तो समुद्राची गुणवत्ता घालवतो नंतर किनारी (आणि सागरी) जीवांना अपाय करतो आणि अस्वास्थ्य निर्माण करतो. अभ्यासातून असेही समोर आले आहे की गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या प्रत्येक चौरस मीटरच्या जागेत सरासरी 20.5 ग्राम प्लास्टीक कचरा (Pastic Garbage) आहे तर 68 ग्राम काचेचा कचरा आहे. (हा काचेचा कचरा अधिकांश दारूच्या बाटल्यांचा आहे).

मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या जाळ्या हाही या कचऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की गोव्याचे किनारे इलेक्ट्रॉनिक (Electronic) कचऱ्यापासून मात्र अजून मुक्त आहे. समुद्र किनाऱ्यांवर गोळा केलेल्या कचऱ्याच्या नमुन्यावरून आढळून आले आहे की त्‍यातल्या बहुतेक साऱ्या वस्तू घरगुती वापराच्या होत्या.

मानवी सभ्यतेच्या, प्रगतीच्या साऱ्या मर्यादा किनाऱ्यावर कचरा मांडून समुद्र दाखवतच असतो. पावसाळ्यात ते तो जरा अधिक गर्जना करत सांगतो. कानांवर हात ठेवून न ऐकल्यासारखे करणे आपण थांबवायची वेळ आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com