19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (31 जानेवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला.
या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा 9 विकेट्स राखून पराभव केला. यासह, भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याचा अर्थ असा की, आता भारत आणि दक्षिण आफ्रिका जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येतील. हा सामना रविवार म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. गट टप्प्यानंतर, भारताने सुपर सिक्समधील सर्व सामने जिंकले. उपांत्य फेरीतही हे वर्चस्व कायम राहिले. आतापर्यंत या स्पर्धेत कोणताही संघ भारताला हरवू शकला नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने शानदार सुरुवात केली. त्यांनी 4 षटकांत 37 धावा केल्या. परंतु यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या. परुनिका सिसोदियाने 5 व्या षटकात 2 विकेट्स घेतल्या.
तथापि, इंग्लंडच्या फलंदाजांनी 44 धावांची भागीदारी करुन सामन्यात पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण आयुषी शुक्लाने 81 धावांच्या खेळीत भारताला तिसरी विकेट मिळवून दिली. येथून इंग्लंड संघाची घसरण सुरु झाली. पुढच्या 12 धावा काढताना इंग्लंडने 5 विकेट गमावल्या. यादरम्यान, वैष्णवी शर्माने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, पारुनिकाने 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या तर आयुषीने 4 षटकांत 21 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. भारताच्या घातक गोलंदाजीनंतर इंग्लंडने कशी तरी 113 धावांपर्यंत मजल मारली. पारुनिकाला तिच्या शानदार गोलंदाजीसाठी 'सामनावीर' म्हणूनही घोषित करण्यात आले.
114 धावांचा पाठलाग करताना दोन्ही भारतीय सलामीवीरांनी शानदार फलंदाजी केली. जी कमलिनी आणि जी त्रिशा यांनी फक्त 9 षटकांत 60 धावा ठोकल्या. पण 9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, 29 चेंडूत 35 धावा करून त्रिशा आऊट झाली.मात्र त्रिशाच्या विकेटचा भारतीय संघावर कोणताही परिणाम झाला नाही. कमलिनी आणि सानिका चाळके यांनी उर्वरित धावा सहज काढल्या. या महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी 50 चेंडूत 56 धावांची अफलातून भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारताने इंग्लंडचा 5 षटके आणि 9 विकेट्स राखून पराभव केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.