
पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांवर वाढत्या शैक्षणिक ताणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या तीन वर्षांत नऊ विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आपले आयुष्य संपवले आहे, अशी धक्कादायक माहिती देत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलून अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
बिट्स पिलानी येथील कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आलेमाव यांनी विधान केले. ‘‘गेल्या दोन वर्षांत या नामांकित शिक्षण संस्थेत चार विद्यार्थी आत्महत्या करून गेले आहेत. याशिवाय, राज्यातील इतर पाच विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेतील ताण, कमी गुण, तसेच नैराश्यामुळे जीवन संपवले आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
आलेमाव म्हणाले, ‘‘ही फक्त स्वतंत्र घटना म्हणून बघता येणार नाही. बिट्स पिलानीसारख्या उच्चस्तरीय संस्थेत वारंवार आत्महत्येच्या घटना होत असतील, तर त्यामागचे मूळ कारण शोधणे ही सरकारची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांवर घरचे, नातेवाईक किंवा शिक्षकांचा अभ्यासात यशस्वी होण्यासाठी दबाव येत आहे का, अभ्यासक्रम फारच अवघड आहे का, याचा सखोल शोध घेणे आवश्यक आहे. गूण आणि दबावासाठी आपण आपल्या तरुणांचे जीव धोक्यात घालू शकत नाही.’’
त्यांनी पुढे सांगितले की, केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगून जबाबदारी संपत नाही. संस्थांनी आणि सरकारने संयुक्तरीत्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, मानसिक आरोग्य सहाय्य, तसेच अभ्यासक्रमावरील ताण कमी करण्यासाठी ठोस उपाय करणे गरजेचे आहे.
आलेमाव यांनी उच्च शिक्षण संचालक आणि राज्य नोडल अधिकारी यांना देखील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.