World Turtle Day: गोव्यात कासवांना 'अच्छे दिन', कासव संवर्धन मोहिमेचे यश

World Turtle Day: सागरी कासवांच्या घरट्यात अंडी घातल्यानंतर सुमारे ४५ ते ५० दिवसांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात.
turtle
turtle Dainik Gomantak

World Turtle Day

१९९० पासून २३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात सागरी कासवांच्या ऑलिव्ह रिडले, हॉक्स बिल, ग्रीन, लॉगर हेड, लेदर बॅक, फ्लॅट बॅक आणि केम्प्स रिडले अशा सात जाती आढळतात. यंदा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कासवाची पिल्ले समुद्रात सोडली, हे कासव संवर्धन मोहिमेचे यश आहे.

काणकोणमधील आगोंद व गालजीबाग सागरी कासव संवर्धन केंद्रात आजपर्यंत सर्वाधिक २३१ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी २२,१८३ अंडी घातली. त्यापैकी १३,२५३ अंड्यांतून पिल्ले बाहेर आली. तसेच ७,१०६ अंडी खराब झाली तर १,१७० पिल्ले समुद्रात सोडण्यापूर्वीच मेली, अशी माहिती वन विभागाच्या दक्षिण गोवा सागरी क्षेत्राचे उपक्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली.

राज्यात मोरजी, आगोंद व गालजीबाग येथे सागरी कासव संवर्धन केंद्रे आहेत. संपूर्ण गालजीबाग किनारा सागरी कासवांच्या संरक्षणासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यासाठी येथील जमीनही संपादित करण्यात आली आहे. राज्यात ऑलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासवांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. मात्र, दुर्मीळ प्रमाणात ग्रीन रिडले जातीचे सागरी कासव येतात.

गालजीबाग येथील कासव संवर्धन केंद्र सागरी कासव अभ्यास केंद्र म्हणून विकसित करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. सागरी कासवांच्या घरट्यात अंडी घातल्यानंतर सुमारे ४५ ते ५० दिवसांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात.

घरट्यातून बाहेर आल्यानंतर प्रकाशाच्या दिशेने ती जातात. मात्र, समुद्राच्या उलट दिशेला प्रकाश असल्यास ती त्या दिशेने जाण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना अन्य जनावरांपासून धोका संभवतो. त्यामुळे कासवांसाठी आरक्षित केलेल्या किनाऱ्यांवर पथदिवे बसविण्यास निर्बंध आहेत.

turtle
Sea Turtle Conservation: कासव संवर्धन मोहिमेला मोरजी किनाऱ्यावर यश! 13,000 पिल्लांना सोडले समुद्रात

कासवांचे आयुष्य १०० ते १५० वर्षे

१. शिकार, व्यापार आणि पाण्याच्या अभावामुळे कासवाचे अस्तित्व पणाला लागले आहे. अनेक दुर्मीळ जातींच्या कासवांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. आज गोड्या पाण्यातून तर कासव हद्दपारच झाले आहेत. कासवांचे अस्तित्व आता फक्त समुद्रातच पाहायला मिळते.

२. कासव हा उभयचर प्राणी आहे. पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी कासव राहू शकतो. कासवाची पाठ खूप टणक असते. समुद्रात राहणाऱ्या कासवाचे सात प्रकार आहेत त्यापैकी भारतात चार प्रकार पाहायला मिळतात. ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि सागरी कासव.

३. समुद्री कासवांची देखील आता मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागली आहे. कासवांच्या पाठीचा दागिन्यांसाठी वापर केला जातो. तसेच त्यापासून ढालीही बनवल्या जातात. चामड्याच्या तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी कासवांच्या त्वचेचा वापर केला जातो. काहीजण आपल्या घरात शोभेसाठी कासव पाळतात. या सर्व कारणांनी बेकायदेशीर असूनही कासवांची शिकार होते, हे विशेष.

४. कासवांचे आयुष्य १०० ते १५० वर्षे इतके असते. मात्र, शिकारीमुळे अनेक कासव अकालीच मरण पावतात. कासवांचे अस्तित्व जमीन आणि पाण्यातील जीवन साखळीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते टिकणे ही काळाची गरज आहे. जर पृथ्वीवरून कासवांचे अस्तित्व नष्ट झाले तर त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Edited By - सुभाष महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com