सासष्टी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल संध्याकाळी कोलव्याला भेट देऊन तेथील मच्छीमारांच्या समस्या व प्रश्र्न जाणून घेतले व ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्र्वासन दिले.
पर्यटन खात्यातर्फे मच्छीमारांना तिथून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. यासंदर्भात आपण कायदेशीर बाजू समजून घेऊन त्यावर उपाय काढू, असे मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांना सांगितले.
पर्यटन खात्याच्या जागेत मच्छीमारांच्या काही झोपड्या आहेत. त्यात ते मासळी सुकवत असतात. शिवाय तेथे ते जाळी, मासळीवर मारण्यासाठी मीठ वगैरे ठेवतात. पर्यटन खात्याने या झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मच्छीमारांनी कडक प्रतिकार करून त्या वाचविल्या होत्या.
या जागेतून आम्हाला हटवू नये, अनेक दशकांपासून आम्ही मच्छीमारी व्यवसाय करीत आहोत, असे लिब्रेटा फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पत्रकारांकडे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपण मच्छीमारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांचे प्रश्र्न व समस्या कायदेशीर किंवा इतर बाजूने कशा सोडविता येतात त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्यांचा सीआरझेडसंदर्भात प्रश्र्न होता, त्यांच्या भाडेपट्टीच्या नूतनीकरण सवलतीबद्दल सकारात्मकरित्या निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.