
वाळपई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील डोंगराळ भागात धोका निर्माण झालाय. राज्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वन विभागानं सत्तरीतील सर्व प्रमुख धबधब्यांमध्ये प्रवेश करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे.
वन विभागाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, धबधब्यांवर प्रवेश करण्यास तसेच आंघोळीस परवानगी नाकारण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
सत्तरीतील शेळपे, करंझोळ, कुमठोळ, चरावणे, हिवरे, सालेली हे धबधबे पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. याठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मात्र, गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्यांच्या प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाहाबरोबर मोठमोठे दगड, झाडं आणि माती वाहून येण्याचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे
धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी धबधब्यांकडे जाणे टाळावे. नियमांचं उल्लंघन केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असं वन खात्यानं सांगितलं आहे.
सध्या संपूर्ण सत्तरी तालुक्यात वातावरण ढगाळ असून, हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.