संतोष गोवेकर
शिवोली, आसगाव पंचायत क्षेत्रातील बादे तसेच हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील शापोरा येथील लोकांनी आत्तापर्यंत जितकी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने केली आहेत, तितकी आंदोलने आत्तापर्यंत अन्य कुठल्याही कारणांसाठी झाली नसतील.
तसे पाहता बादे आणि शापोरा ही दोन्ही गावे समुद्रतटावर वसलेली आहेत. परंतु समोर अथांग सागर असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण पावसाळ्यातही अन् उन्हाळ्यातही होते.
दर पाच वर्षांनी सरकारे बदलतात, पंचायत मंडळेही नवीन स्थापन होतात. परंतु या भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करावी या उद्देशाने एकाही आमदार वा मंत्र्याने आत्तापर्यंत पोटतिडकीने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. म्हणूनच तर भर पावसातही येथील महिला-पुरुष म्हापशातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर वारंवार ‘घागर मोर्चा’ काढताना दिसतात.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा गलथानपणा :
बार्देशातील बहुतेक भागाला नियमित व आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना केवळ शापोरा आणि बादे भागातच पाण्याचे दुर्भिक्ष्य का?. याबाबत अनेकांकडे विचारणा केली असता पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी अनियमितपणे पाणी सोडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर गावात मोठमोठे रहिवासी प्रकल्प उभारण्यात येत असल्याने त्यास पाणीपुरवठा केला जातो.
खासगी टॅंकरवाल्यांची होतेय चांदी
अनेकांच्या घरात नळजोडण्या आहेत. परंतु टेरेसवरील चार मीटर उंचीच्या टाकीत आत्तापर्यंत कधीच पाणी पुरेपूर भरल्याचे आपण पाहिले नसल्याचे या भागातील लोक संतापून सांगतात. पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टॅकरवाल्यांची यामुळे चांदी होते.
शिवोली तसेच आसगाव भागात आपल्या मालकीच्या जागेत विहिरी खोदून पाणीपुरवठा करणारे टॅंकरमागे प्रत्येकी आठशे ते हजारभर रुपये आकारतात. खासगी टॅंकरवाल्यांमुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय होत असली तरी सामान्याला हे दर परवडणारे नाहीत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.