

साखळी: विठ्ठलापूर-कारापूर येथून साखळी बाजारात जाण्यासाठी पूर्वी असलेला लोखंडी पदपूल पाडून त्याजागी प्रशस्त पूल उभारल्याने लोकांची सोय झाली खरी; परंतु या पुलाची निगा राखण्याकडे संबंधित खात्याकडून दुर्लक्ष होत असल्याने या पुलाचा वापर करणाऱ्या लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्यात या पुलावर पाणी साचून राहात असल्याने त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. सध्या अनेक समस्यांच्या गर्तेत हा पूल सापडला आहे. विठ्ठलापूर येथून साखळीला जोडणारा हा पूल साकारल्यानंतर लोकांना त्याचा बराच फायदा होत आहे. परंतु निगराणीअभावी पुलाला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या पुलावर पाऊस पडल्यानंतर बराच काळ पाणी साचून राहते. त्यामुळे या पाण्यातूनच लोकांना चालत जावे लागते. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. पुलाच्या दोन्ही बाजूला हे पाणी भरत असल्याने लोकांना मधल्या भागातून चालत जावे लागते. त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते.
रात्री अंधाराचे साम्राज्य
रात्री वीजदिवे पेटत नसल्याने पुलावर अंधाराचे साम्राज्य असते. या अंधारात रात्रीच्या वेळी चालत जाणे मुली, महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही धोकादायक ठरत आहे. अंधाराचा फायदा घेत पुलाजवळच तयार केलेल्या विरंगुळ्यासाठीच्या जागेत मद्यपान किंवा अनैतिक प्रकार चालतात. या प्रकारांवर नियंत्रण आणावे आणि पुलाची निगा राखावी, अशी मागणी महेश सावंत यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.