

मडगाव: स्वतः एका धर्माच्या संतावर निंदाजनक वक्तव्य करून सर्व नीतिमत्ता घालवून बसलेल्या गौतम खट्टरने गोव्यातील पत्रकारांना नीतिमत्ता शिकवू नये, अशी प्रतिक्रिया ‘गोवा फॉरवर्ड’चे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून प्रतिक्रिया व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले, गोव्यातील पत्रकारांनी नेहमीच नीतिमत्ता बाळगून पत्रकारिता केली आहे. उलट खट्टरसारखे गोव्याबाहेरून येऊन इथे असलेला धार्मिक एकोपा बिघडवू पाहत आहेत. वास्तविक अशा प्रवृत्तींना यापुढे गोव्यातील पत्रकारांनी प्रसिद्धी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रवृत्तींना प्रसिद्धी मिळते, तेव्हा त्यांना अधिक चेव येतो, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते चिराग नायक यांनी खट्टर याने गोव्यातील पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केले त्याचा निषेध करताना गोवा सरकारने अशा प्रवृत्तीच्या लोकांना राज्यात थारा देऊ नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
उजव्या विचारसरणीचा यू ट्यूबर गौतम खट्टर याला आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात अटक केल्यानंतर क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला का, असा प्रश्न सध्या न्यायिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. खट्टर याच्या जामिनाला विरोध करताना, क्राईम ब्रांचने त्याने ज्या मोबाईल फोनवरून आयोजकांशी संपर्क केला, त्यात नेमका काय तपशील आहे ते तपासण्यासाठी तो जप्त करायचा आहे, असा मुद्दा मांडला होता. पण गौतम खट्टर पोलिसांच्या ताब्यात सहा दिवस होता. या कालावधीत हा फोन पोलिसांना जप्त का करता आला नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या कारस्थानात आणखी कुणाचा हात आहे का, हे तपासण्यासाठी गौतम खट्टर याच्याकडून तो जप्त करायची गरज आहे, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. या मुद्द्याचा परामर्श घेताना वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा देसाई यांनी, ज्याअर्थी गौतम पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्यांनी मोबाईल जप्त केला नाही. आणि ज्या कुणी हे भाषण ऐकले, अशांचीही जबानी घेतली नाही. हे पाहता खट्टरला आणखी पोलिस कोठडी देण्याची गरज आहे, असे वाटत नाही, असे म्हटले आहे. ज्येष्ठ वकील ॲड. क्लिओफात कुतिन्हो यांनी न्यायालयाने घेतलेली भूमिका योग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, जामीन मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी गोव्यातील पत्रकारांना आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत राज्यातील सर्वांनी पत्रकारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. खट्टरच्या वक्तव्याने येथील वातावरण गढूळ झाले आहे. आणि ते व्हावे याच उद्देशाने त्याला गोव्यात बोलावून घेतले होते. फूट पाडण्याचा हा कट असून लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.