
सासष्टी: रामा काणकोणकरने इस्पितळातून बाहेर आल्यावर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांचा हात असून आपला पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप केला. रामाला असे बोलायला लावणारा दुसरा कोणी तरी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांनी दिली.
या संदर्भात विचारले असता फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की मुख्यमंत्री किंवा मंत्री सांगतात म्हणून ते सत्य मानता येणार नाही. रामाचा बोलविता धनी दुसरा कोणी आहे का, याची स्वतंत्र चौकशी होणे महत्त्वाचे आहे. ही चौकशी निःपक्षपाती व कुणाचाही हस्तक्षेप न होता झाली पाहिजे.
आपण सनसनाटी करण्यासाठी बेजबाबदार विधाने करणार नाही. आपल्याला या प्रकरणी खोलपर्यंत जाऊन सत्य काय हे जाणून घ्यायला आवडेल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
आम्ही सर्व ‘गोंयकार अगेन्स्ट गुंडाराज’ या गटाखाली एकत्र आलो आहोत. सर्वांनी एकत्र बसून कृती निश्चित केली पाहिजे.
आपचे नेते वेगळी निदर्शने करतात हे योग्य नाही,असेही सरदेसाई म्हणाले. रामाने पोलिसांना काय सांगितले हे माहीत नाही. या हल्ल्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न पोलिस चौकशीत रामाला विचारला गेला का? की टाळला गेला, हेही माहीत नाही, असेही ते म्हणाले.
या सर्व प्रकरणाची चौकशी विश्वसनीय तपास संस्थेद्वारे होणे महत्त्वाचे आहे.आम्हाला गोव्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नको आहे व ते गोव्याला परवडणारे नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.
रामा काणकोणकरने इस्पितळातून बाहेर आल्यावर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांचा हात असून आपला पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप केला. यावरून राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत रामा काणकोणकरच्या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सर्व विरोधकांनी ‘गोंयकार अगेन्स्ट गुंडाराज’ या संकल्पनेअंतर्गत एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. पण त्याच वेळी ‘आप’ने वेगळे धोरण स्वीकारू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेले हल्ला प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र एजन्सीमार्फत तपास झाला पाहिजे, अशी मागणी रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) अध्यक्ष मनोज परब यांनी रविवारी ‘गोमन्तक’शी बोलताना केली.
रामा काणकोणकर यांनी पहिल्यांदा जबाब नोंदवला, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची नावे घेतलेली नव्हती. परंतु, डिस्चार्ज मिळाल्यानंतर मात्र त्यांनी माध्यमांसमोर या दोघांचीही नावे घेतलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांची स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी व्हावी.
रामा काणकोणकरवरील हल्ला प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी,अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. या हल्ल्यामागे सरकारातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याचा संशय रामा याने शनिवारी पत्रकारांसमोर व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जनतेसमोर उघड करण्याची गरज असल्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.
रामा काणकोणकर प्रकरणी ‘आप’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. रामा यांच्या विधानाने भाजप सरकारच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले हे, त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, सत्य जनतेसमोर येत नाही तोपर्यंत नाव घेतलेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
रामा काणकोणकरने जेनिटोचे नाव घेताच त्याला पोलिसांनी अटक केली. चोवीस तास उलटून गेले, रामाने सरकारातील दोन मंत्र्यांवर आरोप केले, तरीही कोणतीही चौकशी झाली नाही, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसचे निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
चोडणकर यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली असून, त्यात पुढे म्हटले आहे की, राज्यातील जनतेला उत्तर हवे आहे. संशयास्पद मंत्री पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित होतो. आपण गोव्याच्या राज्यपालांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि रामावरील हल्ला प्रकरणाची मुक्त-निष्पक्ष चौकशी करण्यासाठी दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा मागतो आणि न्याय सुनिश्चित करण्याची विनंती करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.