

डिचोली: तुळशी विवाहाला जेमतेम दोन दिवस असल्याने सध्या डिचोलीत गावोगावी सर्वत्र या सोहळ्याची ‘लगीनघाई’ सुरू झाली असतानाच या सणावर पावसाचे सावट पसरले आहे. ऐन तुळशी विवाहाच्या तोंडावर (शुक्रवारी) दिवसभर पडलेल्या पावसामुळे तर तयारीच्या कामात अडचण निर्माण झाली आहे.
तुळशी वृंदावन रंगविणे आदी कामे तर खोळंबून पडली असून, पावसामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘व्हडली दिवाळी’ अर्थातच तुळशी विवाह. कार्तिक द्वादशीला म्हणजेच रविवारी (ता.२) सर्वत्र तुळशी विवाह समारंभ साजरा होणार आहे. मात्र, या सणावर पावसाचे सावट असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. हिंदू धर्माप्रमाणे कार्तिक द्वादशीपासून पाच दिवस तुळशी विवाह लावण्याची परंपरा आहे. तरी बहुतेक भागात पहिल्याच दिवशी लग्ने लावण्यात येतात.
तुळशी विवाह म्हटल्याबरोबर विवाहासाठी ऊस, चिंच, आवळे, दिणा, ताडमाड आदी पारंपरिक साहित्य आवश्यक असते.(शुक्रवारी) मोठ्या प्रमाणात नसले, तरी हे साहित्य डिचोलीच्या बाजारात दाखल झाले आहे. म्हावळींगे, कुडचिरेसह गोव्याच्या सीमेलगतच्या काही भागातून हे साहित्य डिचोलीच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.कर्नाटक भागातूनही ऊस बाजारात दाखल झाला आहे. पावसामुळे सायंकाळपर्यंत या साहित्याच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे जाणवत होते.
यंदा आवळ्यांच्या फांद्याची मात्र बाजारात कमतरता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवळ्यांचा भाव वाढणार आहे, असे संकेत काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. पावसामुळे आवळ्यांच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असते. तरीही बाजारात एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळत असल्याने या साहित्याला मागणी असते.
तुळशी विवाहानिमित्त दरवर्षी घरोघरी तुळशीवृंदावनांना रंगकाम करून नवा साज देण्यात येतो. घरोघरी तुळशीवृंदावने नववधूप्रमाणे सजविण्यात येतात. यंदा मात्र पावसामुळे तुळशीवृंदावनांना रंगकाम करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. बहुतेक तुळशीवृंदावनांना अजूनतरी रंगकाम करण्यात आले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसामुळे रंगकाम करायला मिळत नाही, असे एक कलाकार श्याम तिळवे यांनी सांगितले.
पेडणे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी प्रथमच बिगर मोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीत नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके आडवी पडली, तर काही ठिकाणी पिके पुन्हा रुजून बहरताना दिसत आहेत.
कृषी खात्याचे अधिकारी गावागावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत आहेत, तरीही शेतकऱ्यांचा नाराज होणे थांबत नाही. शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की, गेल्या वर्षाचे नुकसान अजून भरपाई मिळालेले नाही. आता अल्प मोबदल्याने न्याय मिळाला तरी पुरेसा नाही.
पेडणे तालुका पारंपरिक कृषिप्रधान क्षेत्र म्हणून ओळखला जातो, परंतु काही लोक बिगर गोमंतकीय भात शेती खरेदी करून शेतीचे रूपांतर बिगर शेतीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतजमिनीमध्ये मातीचा भराव करून जमीन पडून ठेवण्याचे प्रकारही घडत आहेत. त्याचवेळी काही जागृत आणि प्रगतशील शेतकरी विविध प्रयोग करून कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या बिगर मोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा निसर्गानेच तोंडातील घास काढून घेतला, निसर्गानेच मारले; न्याय कुणाकडे मागावा? शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भात नांगरणीसह पेरणी करून शेती केली होती, परंतु कापणीच्या काळात जोरदार पावसामुळे आणि यंत्रणांची कमतरता असल्यामुळे शेत आडवी पडून कुजले, काही ठिकाणी पिके पुन्हा रुजली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.