
वाळपई: वाळपई शहरात रस्त्यावर फिरणारा भटका गोवंश ही गंभीर समस्या बनलेली आहे. परिसरात प्लास्टिक कचऱ्यांनी व्यापलेली रस्त्यालगतची जागा दिसून येत आहे. त्याचा आता थेट परिणाम गाय, वासरू, पाडा अशा गोवंशांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत प्लास्टिकच्या सेवनाने १५४ गोवंश दगावला आहे.
प्लास्टिक खाऊन आजारी पडणाऱ्या गोवंशाच्या उपचारासाठी सध्या धावून जाते ते म्हणजे वाळपई नाणूस येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र. गायींच्या पोटातून अनेकवेळा शस्त्रक्रिया करून ५ ते २८ किलोपर्यंत प्लास्टिक बाहेर काढून गोवंशाला जीवनदान देण्याचे सेवाकार्य या केंद्राने केले आहे.
२०२२ ते आत्तापर्यंत चार वर्षांत केंद्रात ३१६ भटकी बेवारस गुरे ताब्यात घेतलेली होती. त्यातील १७८ प्लास्टिक सेवन केलेली सापडली. चार वर्षांत २२ गुरांवर शस्त्रक्रिया केली असून प्लास्टिकच्या सेवनाने १५४ गोवंश दगावला आहे.
वाळपई नगरपालिकेकडून वाळपई शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जाते व तो कचरा सय्यद नगरातील पठारावरील कचरा प्रक्रिया केंद्रावर टाकला जातो. त्यामुळे कचरा विल्हेवाटीची व्यवस्था असूनही लोकांकडून अवास्तव असा कुठेही कचरा टाकला जातो. परिणामी तो प्लास्टिक कचरा खाऊन गुरे दगावण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढत आहे.
शस्त्रक्रियेवेळी गुरांच्या पोटात जो प्लास्टिकचा गोळा असतो. त्यामध्ये खास करून वाळपई शहरातील गुरांमध्ये कमरेचा लदरचा पट्टा, वायर, खिळे, काळी पिशवी, पांढरी पिशवी, पिवळ्या पिशव्या, कपडे, नायलॉन दोरी, शीतपेयाच्या बाटल्या असे विविध न विरघळणारे प्लास्टिक सापडते. ते गायींना जीवघेणे ठरते
शहरात काही ठिकाणी पाण्याची सोय हवी.
शहरातील कचरापेटी पूर्णपणे बंदिस्त पध्दतीची ठेवावी. किंबहुना लोकांनी स्वच्छता बाळगून शहरात कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
कचरा ठिकाणे केमिकलद्वारे नष्ट करण्याची व्यवस्था हवी.
लोकांमध्ये स्वच्छतेची भावना व्हावी व जनजागृतीची व्हावी.
जीवनसत्व, क्षार युक्त बिस्किटे सरकारने पुरवावी. जेणेकरून रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांना ही बिस्किटे देता येतील.
२०२२ साली ३७ भटकी गुरे ताब्यात घेतली. पैकी १५ गायींच्या पोटात प्लास्टिक आढळले. त्यात शहरातून १५ व ग्रामीण भागातील गायी होत्या. पैकी ३ गायींवर शस्त्रक्रिया करून १७ ते १९ किलोपर्यंत प्लास्टिक काढले. प्लास्टिकमुळे १७ भटकी गुरे दगावली. मृत्यूचे प्रमाण ४०.५४ टक्के एवढे आहे.
२०२३ साली ५३ गुरे ताब्यात घेतली. पैकी ३४ गायी प्लास्टिक बाधित मिळाल्या. त्यात २६ गायी शहरातील व ८ गावांतील होत्या. ४ गायींवर शस्त्रक्रिया करून सरासरी २१ किलो प्लास्टिक बाहेर काढले व २२ गायी प्लास्टिक सेवनाने मरण पाऊन ती टक्केवारी ६४.१५ एवढी होती.
२०२४ साली ६२ गुरे ताब्यात घेतली. पैकी ४१ गुरे प्लास्टिक बाधित होती. त्यात शहरातील ३५ व गावांतील ६ गुरांचा समावेश आहे. ८ जणांवर शस्त्रक्रिया केली व सरासरी २३ किलो प्लास्टिक सापडले. ३४ गुरे प्लास्टिक सेवनाने दगावली असून टक्केवारी ६६.१२ एवढी आहे.
२०२५ या वर्षात आत्तापर्यंत १६४ भटकी गुरे ताब्यात घेतली आहेत. त्यात ८८ गुरांमध्ये प्लास्टिक सापडले असून ५९ शहरातून व १४ गावांतील आहेत. ७ गायींवर शस्त्रक्रिया करून २८ किलोपर्यंत प्लास्टिक काढले व ८१ गुरे प्लास्टिक सेवनाने दगावली आहेत. मृत्यूची टक्केवारी ५३.६५ टक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.