

वाळपई: जोपर्यंत मी सक्रिय आहे, तोपर्यंत सत्तरीच्या विकासाची धुरा मी सांभाळणार आहे. विरोधक कितीही टीका करो, सत्तरीचा विकास थांबणार नाही. भाजप सरकार सेवाभाव, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांवर काम करत असून सत्तरीचा कायापालट हा आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
नगरगाव जिल्हा पंचायतीसाठी रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार प्रेमनाथ दळवी यांच्या धावे येथे आयोजित प्रचार सभेत राणे बोलत होते. यावेळी उमेदवार प्रेमनाथ दळवी, नगरगावच्या सरपंच ऊर्मिला गावस, उपसरपंच राजेंद्र अभ्यंकर, पंच मामू खरवत, देवयानी गावकर, रामा खरवत, विनोद शिंदे आदींची उपस्थिती होती.
राणे पुढे म्हणाले की, भाजपमुळे सत्तरीत मोठ्या प्रमाणात विकास शक्य झाला. पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक क्षेत्रात बदल झाले आहेत. निवडणुकीच्या काळात अनेकजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, पण अशा भूलथापांना बळी पडू नका. सत्तरीच्या युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी संधी आणि ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करणे ही आमची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपतर्फे प्रेमनाथ दळवी (नगरगाव), नीलेश परवार (केरी), नामदेव च्यारी (होंडा) व समीक्षा नाईक (उसगाव) रिंगणात आहेत, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. हे उमेदवार सुशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख आहेत. ही निवडणुका म्हणजे २०२७ च्या विधानसभेची तयारी आहे, असे राणे म्हणाले.
पंतप्रधानांचा विश्वास महत्त्वाचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर असलेला विश्वास महत्त्वाचा असून देशातील विविध निवडणुकांमध्ये प्रचाराची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे आणि ती मी निष्ठेने पार पाडली आहे. सत्तरीच्या विकासातही त्यांचे योगदान आहे, असे ते म्हणाले.
न्यायालयाचा निर्णय मान्य
म्हादईचा प्रश्न असो वा व्याघ्र प्रकल्प सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य असेल. न्यायालयापुढे मंत्रीही असाहाय्य असतो, असे राणे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.