

पणजी: उत्पल पर्रीकर यांनी तूर्त ‘एकला चलो रे’ चे धोरण अवलंबले आहे. भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.
पणजी महापालिका निवडणुकीत ३० उमेदवार उतरवण्याचा निर्णय त्यांनी याआधीच घेतला आहे. दामोदर नाईक भाजप प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर भाजपात प्रदेश पातळीवर सकारात्मक बदल होतील अशी उत्पल यांना अपेक्षा होती. त्यांनीही दामू यांचे खुल्या मनाने स्वागत केले होते.
तरीही आणखी पर्रीकर नको म्हणणाऱ्यांचीच सध्या सरशी असल्याचे उत्पल यांना दरम्यानच्या काळात जाणवत गेले आणि त्यांनी तूर्त एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. भाजपचे पणजीतील मूळ कार्यकर्ते उत्पलसोबत आहेत. त्यांनी बैठका घेणेही सुरू केले आहे. मनपावर झेंडा फडकावणे विधानसभा निवडणूक जिंकण्याहून कठीण असल्याची सर्वांना जाणीव आहे.
पणजीच्या अस्तित्वासाठी मतदार सोबत कसे येतील, याचा विचार करून व्यूहरचना करण्यात येत आहे. पणजीचे बाबूश मोन्सेरात आमदार आहेत. ते महसूलमंत्रीही आहेत. विधानसभेत प्रतिकूल निकाल आला तर ते भाजपसोबत राहतील का, यावर सत्ताधारी वर्तुळात साशंकता आहे. त्यामुळे उत्पल यांना जवळ करावे, असेही काहींना वाटत होते.
मात्र असे मत असणारे अल्पमतात असल्याने उत्पल यांचा भाजप फेरप्रवेश लांबणीवर पडत आहे. उत्पल यांचा विषय दिल्ली दरबारीच सुटेल, असे माजी प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणत असत. आता दामू यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ म्हणत निदान प्रदेशस्तरावर निर्णय होऊ शकतो, असे संकेत दिलेत.
सध्या स्वतंत्रपणे पणजी मनपा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणजीचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. पणजीवासीय साथ देतील याची खात्री आहे.
उत्पल पर्रीकर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.