

पेडणे: कुडचडे येथे रेती माफियांकडून झालेल्या गोळीबारात रेती उपसा करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेस तीन वर्षे पूर्ण होत असतानाच, सोमवारी मध्यरात्री जैतीर–उगवे येथील तेरेखोल नदीतून रेती काढणाऱ्या कामगारांवर झालेल्या गोळीबारात रमेश पासवान व लालबहादूर गोंड (दोघेही बिहार) गंभीर जखमी झाले.
या घटनेमुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली असून, कायदा–सुव्यवस्थेच्या विषयावरून विरोधकांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैतीर–उगवे येथील तेरेखोल नदी परिसरात सोमवारी मध्यरात्री आठ जणांचा गट होता. त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यात रमेश पासवान व लालबहादूर गोंड हे दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यातील एकाच्या मानेला घासून गोळी गेली, तर दुसऱ्या कामगाराच्या दंडाला गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत दोघांनाही उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोन परप्रांतीयांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधला.
यावेळी त्यांच्यासोबत गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक तुषार लोटलीकर, राजेश कुमार, पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरेही उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, अशी हमी यावेळी पत्रकारांशी बोलताना गुप्ता यांनी दिली.
१.जैतीर–उगवे येथील गोळीबार प्रकरणाचा क्राईम ब्रांच आणि पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास सुरू आहे.
२.तेरेखोल नदी परिसरात आठ जणांच्या गटावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
३.या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच नेमके सत्य बाहेर येईल.
४.आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
५.दोन्ही जखमी बिहारमधील असून, त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
यापूर्वी २०१० मध्ये महाखाजन येथे शापोरा नदीत रेती उत्खननामुळे आपल्या घर व बागायतीला धोका उत्पन्न झाला असून जवळील नदीत रेती काढू नये अशी मजूरांना विनंती करूनही ते ऎकत नसल्याने मजुरांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात एक मजूर जखमी झाला होता. याप्रकारणी महिलेस अटक झाली होती. त्याचवर्षी तेरेखोल नदीजवळ आपल्या बागायतीची जमीन कोसळत आहे म्हणून कवठण (सिंधुदुर्ग) येथील एका शेतकऱ्यांने होडीतून येऊन रेती कामागारांवर हल्ला केला. त्यात एका मजूराचा नदीत पडून मृत्यू झाला होता.
१.राज्यात नद्यांमधून रेती उपशास बंदी आहे. तरीही तेरेखोल नदीतून रात्रीच्यावेळी रेती उपसा होत असल्याचा दावा स्थानिक करतात. हे प्रकार अजूनही कसे काय सुरू?
२. सोमवारी कामगारांवर कोणी आणि कशासाठी गोळीबार केला?
३. रेती व्यवसायातील स्पर्धेतून हा गोळीबार झाला असावा? की इतर कारणातून?
४. या घटनेतून रेती माफियांनी पुन्हा मान वर काढल्याचे सिद्ध होते का?
जैतीर–उगवे येथील गोळीबार प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे निर्देश आपण पोलिसांना दिले आहेत. राज्यातील कायदा–सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
बेकायदा रेती उपशावर नियंत्रण आणण्यात गृहखाते, पोलिस अपयशी ठरल्याचे जैतीरमधील गोळीबारातून पुन्हा एकदा उघड. बाहेरून येऊन अनेकजण कायदा–सुव्यवस्थेला आव्हान देत असतानाही सरकार, पोलिस गप्प का?
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.