तिसवाडी, राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आज बांबोळी झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीवरील दोघांचा बळी गेला. चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून स्वयंअपघात अशी नोंद आगशी पोलिसांनी याप्रकरणी केली आहे.
हा अपघात सायंकाळी ४.१० वाजता घडला. दुचाकीस्वार अच्युत रंजन गोगोई (वय १९ वर्षे, मूळ आसाम) हा आणि सहचालक पापू गोगोई दोघे मिळून जीए-०६-जी २३५१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पणजीच्या दिशेने जात होते.
बांबोळी-शिरदोन येथील उड्डाण पुलावर अचानक दुचाकीवरील ताबा सुटून त्याने थेट बाजूच्या वीजखांबाला जोरदार धडक दिली. नंतर दुचाकीने दुभाजकाला ठोकर देत पुढे मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बसलाही धडक दिली.
या दुर्घटनेत गोगोई हा जागीच ठार झाला, तर सहचालक गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले; मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.
२०२४ साल सुरू होऊन रविवारी १०४ दिवस पूर्ण झाले. या १०४ दिवसांत गोव्यातील रस्त्यांवर तब्बल ७५ जणांचे बळी गेले असून त्यापैकी ४६ बळी हे दुचाकीस्वारांचे आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा राज्याची प्रतिमा ‘किलर स्टेट’ अशी झाली आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाय योजण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.