तिलारी कालव्याला गळती; हजारो लिटर पाणी वाया

घरांना धोका: तिलारी कालव्याला तोरसेत गळती
 तिलारी कालवा
तिलारी कालवाDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: तोरसे राजवेल येथे तिलारी कालव्याला ठिकठिकाणी गळती लागल्याने कालव्याचे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील घरांनाही धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कालव्याची दुरुस्ती करावी, किंवा या कालव्याच्या व्यतिरिक्त जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा शेती-बागायतीना करावा, अशी स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

जलसिंचन खाते एका बाजूने बैलपार कासारवर्णे नदीच्या बाजूला २७ कोटी रुपये खर्चून पंप हाऊस बसवण्याचे काम करत आहे. या नदीचे पाणी म्हणे सरकार तिळारी कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पुरवणार आहे. परंतु पेडणे तालुक्यात जे जे कालवे ज्या बागायती, शेतीच्या जवळून गेले आहेत ते कालवे नादुरुस्त आहेत, ठिकठिकाणी ते कालवे फुटलेले आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी या कालव्यातून गळून वाया जाते.

 तिलारी कालवा
‘मुलींनाही शिकण्‍याची समान संधी मिळायला हवी’

चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या कालव्यातून पाणी वाहून गेल्याने सभोवतालच्या घरापर्यंत पोहोचले होते. अनेक शेतातले पाट मार्च महिन्यात कोरडे होते. पण अचानक पाणी आल्याने लोकांना अचानक आलेले पाणी कुठून आले, हे कळेना. अखेर ठिकठिकाणी शेतात पाण्याचे लोट आल्याने कळले की वरच्या बाजूला असलेल्या कालव्याला गळती लागली आहे.

सर्व्हे 193/1 आणि सर्वे नंबर 188/0 नंबर या डोंगराच्या पलीकडून ऊंच भागातून कडशी नदी वाहते.डोंगराळ भागातील मुरूमाड मातीचा परिसर असल्याने नैसर्गिकरीत्या कडशी नदीचे पाणी तोर्से गावातील आमटव्हाळ, फोंडान, सावरीचे भोम, माऊली मंदिर, घाडीगावठाण, ग्रामपंचायत ते हायस्कूल, तांबोसेपर्यंतच्या सखल भागात झिरपते.

स्थानिक शेतकरी शिवराम परब यांनी सांगितले,की या कालव्यातून जे पाणी शेतीला मिळायचं आहे ते पाणी शेतीला मिळत नाही. ते दररोज वाया जात आहे. पूर्वी ते कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी सरकारने ही योजना आखली होती.पण सध्या वाया जाणारे पाणी पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. परंतु हे पाणी कुठे मुरते आणि कुठे जाते ते काही कळत नाही,असेही ते म्हणाले.

 तिलारी कालवा
होळीच्या पार्श्वभूमीवर कोलवा बीच ठरला मद्यपानाचा अड्डा

जागृत शेतकरी तथा माजी पंच सदस्य उमेश गाड यांनी सांगितले,की कालवा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांसाठी सरकारने आणला होता. परंतु ती अपेक्षा आजपर्यंत पूर्ण झाली नाही. या कालव्याचे बांधकाम करताना अभियंत्यांचे दुर्लक्ष झाल्याने हा कालवा निकृष्ट दर्जाचा ठरला आहे. वारंवार गळती लागत आहे आणि पाणी हजारो लिटर वाया जात आहे. कालव्यांना भगदाड पडले तर नजीकच्या लोकवस्तीला धोका संभवत असतो. कालव्यातून पक्की जलवाहिनी घालून त्याद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही गाड यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com