
पणजी: ‘पदवी मिळवली, पण पोटाची खळगी भरायला अजून संघर्ष सुरूच आहे!’ गोव्यातील हजारो उच्चशिक्षित तरुण आज अशा परिस्थितीत आहेत. रोजगार विनिमय केंद्रात नोंद झालेल्या तब्बल ५६ हजार २७६ उमेदवारांपैकी बहुसंख्य पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत, हे चित्र थोडे थोडके नव्हे, तर काळजी वाढवणारे आहे.
२५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात नोंदले आहेत. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.सारख्या पदव्या घेऊन हजारो तरुण सरकारी नोकरीच्या आशेने रांगेत उभे आहेत. फक्त बी.कॉम. पदवीधरांची संख्या तर ३ हजार ४७९ इतकी आहे, तर इंजिनिअरिंगची कठीण वाट पार केलेलेही ८५९ तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
२६ ते ३५ वयोगटात ही संख्या आणखी वाढते. येथे बी.कॉम. धारक १० हजार ७६१ आहेत, तर इंजिनिअर्स ४ हजार २०७! एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम., फार्मसी, वकील, डॉक्टर अशा उच्च शिक्षण घेतलेल्या हजारो युवकांनीही रोजगारासाठी नोंदणी केली आहे.
पदवी मिळवूनही रोजगाराच्या संधी अपुऱ्या पडत असल्याचे हे वास्तव बोलके आहे. सरकारी नोकरीच्या स्थैर्याचा मोह आणि खासगी क्षेत्रातील अनिश्चिततेची भीती यामुळे आजचा तरुण सरकारी नोकरीच्या शोधात दिवस काढतो आहे. हे दृश्य केवळ रुणाईच्या स्वप्नांचा आणि संघर्षाचा जिवंत दस्तऐवज ठरत आहे!
गोव्यातील सरकारी नोकऱ्यांचा शोध घेणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोजगार विनिमय केंद्रात नोंद झालेल्या ५६ हजार २७६ उमेदवारांपैकी मोठा वाटा उच्च शिक्षित उमेदवारांचा आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विविध वयोगटातील उमेदवारांनी केंद्रात नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे केवळ बारावी उत्तीर्ण नव्हे, तर पदवीधर, पदव्युत्तर आणि अभियंते, डॉक्टर्स, वकील यांसारख्या व्यावसायिक पदव्या घेतलेले उमेदवारही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
याशिवाय एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.डी./एम.एस., एल.एल.एम. यांसारख्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १५ ते २५ वयोगटातील सुमारे १७०० हून अधिक उमेदवारांनीही नोंदणी केली आहे. यामध्ये एम.एस्सी. धारक ७२८, एम.ए. धारक ४५२ आणि एम.कॉम. धारक ३०९ इतके आहेत. ही आकडेवारी पाहता, उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अनेकांना स्थिर सरकारी नोकरीची अपेक्षा असल्याचे दिसते. रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, सरकारी क्षेत्रातील सुरक्षित नोकरीसाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे स्पष्ट होते.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. पदवीधारकांची संख्या अनुक्रमे १९७४, ३४७९ आणि १८०९ इतकी आहे (१५ ते २५ वयोगटात). २६ ते ३५ वयोगटात ही संख्या आणखी वाढलेली असून अनुक्रमे ४७१३, १०७६१ आणि २७९१ इतकी आहे. इंजिनिअरिंग पदवीधारकांमध्येही नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली असून १५ ते २५ वयोगटात ८५९ व २६ ते ३५ वयोगटात ४२०७ उमेदवार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.