Utpal Parrikar: इलेक्शनच्या फंडिंगसाठीच ‘स्मार्ट सिटी’चे काम दुर्लक्षित

उत्पल पर्रीकर यांचा आरोप : सीईओ संजीत रॉड्रिग्स यांना निवेदन
Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak

पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली चाललेली खोदाई रेंगाळत असून त्याचा फटका पणजीवासीयांसह छोट्या,

मोठ्या व्यावसायिकांनाही बसत आहे. इलेक्शन फंडिंगसाठी या कामाचा दर्जा व दिरंगाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा खळबळजनक आरोप उत्पल पर्रीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

Utpal Parrikar
Sunburn Festival: गोव्याची प्रतिमा मलिन करणारा 'सनबर्न' गोव्यातून कायमचा हद्दपार करा - हिंदू जनजागृती समिती

या विषयावरून नगरसेवक महापौरांवर अविश्वास ठराव का आणत नाहीत, आता त्यांची संवेदनशीलता कुठे गेली, असा भावनिक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनाही बाबूशकडून इलेक्शन फंडिंग हवे आहे म्हणून ते गप्प बसले आहेत का, अशी विचारणाही उत्पल यांनी केली.

त्यांनी आज स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांची भेट घेतली आणि त्यांना पाच मागण्यांचे निवेदन सादर केले. उत्पल यांनी पणजीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असून पुढील आठवड्यात त्यांना ती वेळ देण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महालक्ष्मी ट्रस्टच्या कार्यालयात माजी नगरसेवक दीपक म्हापसेकर, शुभदा धोंड, सुरेश चोडणकर आणि रेखा कांदे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्पल म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामात १५ ट्रक कलंडले. अखेरीस मला ट्रक कलंडला की माध्यमांसमोर बोलायचा कंटाळा आला.

हे असे होणार, हे मी निवडणुकीपूर्वीच सांगत होतो. पणजीला अकार्यक्षम, असंवेदनशील लोकप्रतिनिधी लाभल्याने ही स्थिती उद्‍भवली आहे. अकार्यक्षम उमेदवारामुळेच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मला भाजपमध्ये पंतप्रधानांसह कोणा-कोणाचा वाईटपणा पत्करावा लागला, त्याची माहिती मलाच आहे.

१५ दिवसांनी पाठपुरावा करणार

उत्पल म्हणाले की, संजीत रॉड्रिग्स हे या शहराची माहिती असलेले चांगले अधिकारी आहेत. आज त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १५ दिवसांनी त्यांना पुन्हा भेटून पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिली तर नववर्षावेळी पणजीत अजिबात पोलिस दिसले नव्हते, यासह इतर बाबी मांडणार आहे.

पणजीत छोटे छोटे व्यावसायिक आहेत. त्यांचे व्यवसाय बंद राहिले तर त्यांच्या उपजीविकेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांचे लक्ष वेधणार आहे.

नेता निवड चुकीची

पणजीच्या लोकप्रतिनिधीने आपल्या अकार्यक्षम मुलालाही महापौरपदी बसवले, असा आरोप करून ते म्हणाले की, खरे तर चुकीचा लोकप्रतिनिधी निवडणे, हीच समस्या आहे. ती दूर केल्याशिवाय हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. पणजीच्या सुजाण नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे. केवळ डांबर घालण्याचा अनुभव असलेल्यांना उच्च दर्जाची कामे दिली की काय होते, याचे पणजी हे उत्तम उदाहरण आहे, असेही उत्पल म्हणाले.

निवडणुकीसाठी जनतेचा वापर

आता जे बोलतो आहे, त्यात राजकारण मुळीच नाही. पणजीतील लोक मला दूरध्वनी करून समस्या मांडत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज यंत्रणेपर्यंत पोचवण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. पणजीच्या लोकप्रतिनिधींसाठी मतदार, जनता ही निवडणुकीसाठी वापरून घेण्याची गोष्ट आहे. महापालिका किंवा विधानसभेची निवडणूक, पैसे देऊन जिंकू शकतो, असे त्या लोकप्रतिनिधीला वाटते. त्यासाठी कोणताही पक्ष असला तरी त्यांना चालतो, अशी कोपरखळीही उत्पल यांनी लगावली.

सुरक्षाविषयक परीक्षण करा!

उत्पल पर्रीकर यांनी ‘इमॅजिन स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांची भेट घेतली. या भेटीविषयी उत्पल यांनी सांगितले, की कामांचे सुरक्षाविषयक परीक्षण झाले पाहिजे, गुणवत्तेचे परीक्षण झाले पाहिजे, काम पूर्ण करण्याचे दिवस ठरवून दिले पाहिजेत, शहरभर कंत्राटदाराने रस्त्यांचा वापर साहित्य ठेवण्यासाठी केला आहे, ते साहित्‍य हटवले पाहिजे, आणखी खोदाई करता कामा नये तसेच जनतेशी सुसंवाद वाढवला पाहिजे अशा मागण्या केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com