
पणजी: राज्यात मागील काही महिन्यांपासून लसणीचे दर वाढलेले आहेत. लहान आकाराची लसूण 400 रुपये प्रतिकिलो तर मध्यम आकाराची जवारी लसूण तब्बल 600 रुपये किलो दराने विकली जात आहे. लसूण हा मसाल्यातील आणि फोडणीतील महत्त्वाचा घटक असल्याने लसणाची फोडणी सर्वसामान्यांसाठी आता उग्र झालेली आहे.
राज्यात महागाईचा (Inflation) भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संसाराचा गाडा चालवण्यासाठी जीवनावश्यक असणारे तांदूळ, डाळी, तेल, भाजीपाला आदीचे दर गगनाला भिडले असून महिना दहा-पंधरा हजार कमवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन खर्चाची गणिते बिघडत आहेत. या भरमसाट दरवाढीवर कोणच बोलत नसल्याने सर्वसामान्यांना आता कोणी वालीच उरला नाही का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
बाजारात जरी साधा तांदूळ घ्यायचा म्हटले तरी 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. तूरडाळ 200 रुपये तर हिरवा वाटाणा 220 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
राज्यात मागील आठवड्यात कांदा (Onion) आणि टोमॅटोच्या दरात घट झाली होती; परंतु आता पुन्हा कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 50 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता 80 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून टोमॅटो आणि बटाटाची 50 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. राज्यात पालेभाज्या तसेच फळभाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.