
पणजी: तामिळनाडू नारळ उत्पादनात देशात अग्रस्थानी आहे. तेथे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे, जमीन लागवडीखाली येत आहे. तेथील राज्य सरकार २० लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविते. त्याचा परिणाम शेती उत्पादन वाढले असून, भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे. आम्हाला तामिळनाडू हे राज्य शेती क्षेत्रात सर्वोत्तम तथा अग्रस्थानावर न्यायचे आहे, असे मत तामिळनाडूचे कृषिमंत्री एम.आर.के. पनीरसेल्वम यांनी व्यक्त केले.
नारळ परिषदेत पनीरसेल्वम यांनी उद्घाटनाच्या भाषणात व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आणि नारळ परिषद आयोजित केल्याबद्दल ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, सकाळ समूहाचे सीईओ उदय जाधव यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
पनीरसेल्वम पुढे म्हणाले, तामिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून मदत होत नव्हती, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत होते; परंतु ‘डीएमके’ सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष अर्थसंकल्पात ४५ हजार कोटींची तरतूद केली.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील ‘डीएमके’चे सरकार शेतकऱ्यांना विविध मार्गाने मदत करीत आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी वीज मोफत दिली, त्यामुळे शेतकरी भात, मिलेट्स, काजू उत्पादन करू लागले. काजू आणि नारळ उत्पादनात राज्य अग्रेसर राहिले आहे.
वीज मोफतचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना झाला आहे. ६० लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला गेला आहे. कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे, त्याशिवाय वेगळ्या कृषी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आमूलाग्र कल्पना मिळत आहेत, असेही पनीरसेल्वम यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.