
पणजी: ताळगाव मार्केटमध्ये सोमवारी रात्री (३ जून) एका मोबाईल/स्टेशनरीच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे १५ लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुकानाचे मालक गोविंद चारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११-११:३०च्या सुमारास दुकानाने पेट घेतल्याची माहिती देणारा एक फोन त्यांच्या मित्राकडून करण्यात आला. या गंभीर प्रकरणात विद्युत उपकरणं, कॅमेरा, मशीन जाळून खाक झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिलीये. ही आग एवढी भीषण होती की नुकसानीचा आकडा १५ लाखांवर जाऊन पोहोचल्याचं सांगत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
दुकान मालक गोविंद चारी हे दुकान रेंटवर चालवायचे आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार या दुकानावरच अवलंबून होता. दरवेळी रात्री ९:३०-९:४५ च्या सुमारास दुकान बंद करून घरी परतणारे गोविंद चारी हे नेमके घटनेचं दिवशीच पत्नी आजारी असल्याने लवकर घरी निघून गेल्याचं त्यांनी सांगितलं.
दुकानाने पेट घेतल्यामुळे सध्या आर्थिक भार उचलणं कठीण जाणार आहे तरी गोविंद चारी यांनी जिद्ध सोडलेली नाही, हातपाय धडधाकट असे पर्यंत कितीही मेहनत करता येते असं म्हणत त्यांनी हिम्मत दाखवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद असताना आगीचा भडका उडाल्याने, दुकानातील सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दुकानात असलेले महागडे मोबाईल फोन, स्टेशनरीचे साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.