

पणजी: राज्यातील आगामी पालिका आणि विधानसभा निवडणुकीआधी प्रथम प्रदेश काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर बळकट करण्यात येईल. त्यानंतरच समविचारी पक्षांसोबत युतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस–गोवा फॉरवर्ड युतीने ११ जागा मिळवल्या. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या चार जागा आलेल्या होत्या. परंतु, यावेळी काँग्रेस सदस्यांची संख्या चारवरून दहा झाल्याने पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढलेले आहे.
राज्यात पुढील काळात पालिका, महानगरपालिका आणि २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या सर्वच निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याचे निर्देश काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार येत्या फेब्रुवारीपासून आपण तयारी करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रथम पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघातील बूथ संघटना मजबूत करण्यात येतील. पक्षापासून दूर असलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा सक्रिय केले जाईल, असे ते म्हणाले.
भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेला गोव्यात पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणायचे आहे, हे विशेषत: दक्षिण गोव्यातील जनतेने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे. उत्तर गोव्यातील काही मतदारसंघांत काँग्रेस कमकुवत झालेला असल्याने यापुढे उत्तर गोव्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. चाळीसही मतदारसंघांतील संघटना मजबूत केल्यानंतरच समविचारी पक्षांसोबत युतीबाबत चर्चा सुरू केली जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.