

मडगाव: मागच्या चार वर्षात दक्षिण गोव्यात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची प्रकरणे वाढली असून आतापर्यंत एकूण अशा ११७ प्रकरणाची नोंद झाली आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ३० अपहरणाची प्रकरणे या जिल्ह्यात नोंद झाली आहेत.
अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची ही वाढती प्रकरणे ही चिंतेची बाब बनली असून हे प्रमाण कमी करण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या मुलांमध्ये ९८ टक्के प्रकरणे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची आहेत.
कित्येकवेळा मुले काही कारणावरून स्वतः घर सोडून जातात पण कायद्यानुसार अल्पवयीन मुले घरातून नाहीशी झाल्यास ते प्रकरण अपहरण म्हणून नोंद केले जात असल्याने हा आकडा फुगलेला दिसतो मात्र काही प्रकरणात खरेच मुलांचे अपहरण झाल्याची बाब उघड झाली आहे अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
कित्येकवेळा प्रेम प्रकरणातून पळून जाण्याच्या घटना घडतात त्याही अपहरण म्हणूनच नोंद केल्या जातात असे त्यांनी सांगितले. यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. प्रीतम मोरायस यांनी अल्पवयीन मुले गायब झाल्यास ही प्रकरणे अपहरण म्हणून नोंद करावीत असे कायद्याचे बंधन आहे.
या मुलांची जाणीव प्रगल्भ नसल्याने अशा प्रकरणांची त्वरित चौकशी करण्याची गरज असते. २४ तासांच्या आत चौकशी सुरू न झाल्यास ते धोक्याचे ठरू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकरणी गुन्हेगारांना १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयातून जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यानुसार २०२२ मध्ये अशा ३० प्रकरणाची नोंद झाली होती. त्यातील २७ प्रकरणांचा छडा लावण्यास पोलिस यशस्वी ठरले होते. २०२३ मध्ये अशा प्रकारची ३१ प्रकरणे नोंद झाली झाली होती, त्यातील सर्व प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला. २०२४ मध्ये हे प्रमाण वाढून ३५ वर पोहोचले होते, त्यातील २९ प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेतला. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत २१ प्रकरणांची नोंद झाली असून त्यातील किती प्रकरणांचा छडा लावला गेला याची नोंद प्राप्त झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.