
म्हापसा: सुकूर - बार्देश येथील नीलेश गजानन च्यारी यांचे ‘ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅम’ (वीस कलमी वसाहतीत) उभारलेले घर गेल्या मार्च २०२५ मध्ये स्थानिक पंचायतीने अतिक्रमण हटाव पथकाद्वारे पाडले. मुळात, राज्य सरकार अनधिकृत किंवा वीस कलमी वसाहतीमधील बांधकामे अधिकृत करणार असल्याचे विधेयक आणणार याची पूर्वकल्पना असूनही पंचायतीने एका मंत्र्याच्या सूचनेनुसार च्यारी यांच्या घराला लक्ष्य केले.
‘नीज गोंयकारा’ला सरकारने बेघर केले असून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीतर्फे प्रवक्ते संतोष मांद्रेकर यांनी केली. म्हापशात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे संयोजक दीपेश नाईक व नीलेश च्यारी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
संतोष मांद्रेकर पुढे म्हणाले की, मुळात अनधिकृत बांधकामे कायदेशीर करण्याचा मसुदा हा काही दोन दिवसांत तयार केला नाही. त्यामागे बरेच महिने प्रशासकीय प्रक्रिया झाली आहे. असे असताना संबंधित मंत्र्यांच्या निर्देशानुसार, च्यारी यांचे घर मुद्दामहून पाडले, असा दावा त्यांनी केला.
मंत्र्यांनी राजकीय सूडापोटी नीलेश च्यारी यांच्या घराला लक्ष्य केले. मुळात याच वीस कलमी वसाहतस्थळी अनेक बिगर गोमंतकीयांची अनधिकृत बांधकामे आहेत. परंतु, त्यांना लक्ष्य केले नाही. मात्र, नीलेश च्यारी यांच्यासोबत राजकीय मतभेदामुळेच त्यांचे घर पंचायतीमार्फत पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
दीपेश नाईक म्हणाले की, राज्य सरकारने सूडबुद्धीने नीलेश च्यारी यांच्या घराला लक्ष्य केले. सरकारने बिगर गोमंतकीयांना खूश करणे व आपली व्होट बँक सांभाळण्यासाठीच हे घरे कायदेशीर करण्याचे विधेयक आणले. या विधेयकाला आम्ही आव्हान देऊ, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.