School Syllabus : तिसरी, सहावीचा बदलणार अभ्यासक्रम; शिक्षण खात्याचे संकेत

School Syllabus : अकरावी प्रवेशाबाबत अधिसूचना नसल्याने उडाला गोंधळ
Student Syllabus
Student Syllabus Dainik Gomantak

School Syllabus :

पणजी, आगामी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता तिसरी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे.

त्याशिवाय नव्या शिक्षण धोरणानुसार (एनईपी) शैक्षणिक बदल इयत्ता नववीच्या वर्गाला लागू करण्याविषयी राज्य शिक्षण संचालनालयाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाविषयी शालान्त मंंडळाने विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना तोंडी माहिती दिली असून, त्याविषयीची अधिसूचना सरकारी पातळीवरून निघालेली नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.

राज्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी गतवर्षी राज्य शिक्षण संचालनालयाने लागू केली. नव्या एनईपी’नुसार संचालनालयाने गतवर्षी फाऊंडेशन स्टेजच्या एकूण पाच टप्प्यांपैकी तीन वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली, त्यानुसार अंगणवाडी-नर्सरी-प्रीस्कूलमध्ये यापूर्वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गतवर्षांपासून फाऊंडेशन स्टेज लागू झाले.

शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले की, केंद्राच्या ‘एनईपी’च्या अंमलबजावणीची २०३० पर्यंतची दिलेली मुदत लक्षात घेऊन ती अंमलात आणणेस सुरुवात केली आहे. त्यानुसार फाऊंडेशन-१ पासून ते बारावीपर्यंत एनपीई २०२८ पर्यंत राज्यात पूर्णपणे अंमलात येईल, यासाठी आखणी केली आहे. त्यानुसार ते-ते शैक्षणिक वर्ष त्या-त्या वर्षी अंमलात आणण्यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे.

प्रिपॅरेट्री स्टेज म्हणजे इयत्ता तिसरी ते पाचवीमधील इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. त्याशिवाय सहावीचाही अभ्यासक्रम बदलणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे याला थोडा विलंब होत आहे. इयत्ता तिसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची हार्डडिस्क आणण्यासाठी खात्याची व्यक्ती दिल्लीला गेली आहे.

तसेच शिक्षण सचिवांवर निवडणुकीची जबाबदारी असल्याने ते राज्याबाहेर आहेत. त्यामुळे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे एनईपीच्या अंमलबजावणीविषयी त्वरित चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार आहे.

बारावीत जाणाऱ्यांचे काय?

गतवर्षी दहावीतून अकरावीत विविध शाखांना प्रवेश घेतलेले आणि यंदा बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कशा तऱ्हेने प्रवेश मिळणार, याबाबत सुस्पष्टता विद्यार्थ्यांना व पालकांना मिळालेली नसल्याने हे घटक गोंधळात आहेत. परंतु विद्यालयांनी बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या शाखेतच प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यालयांनी शाखानिहाय प्रवेश अर्जही छपाई करून घेतलेले आहेत.

जरी विद्यार्थ्यांना विषय निवडीचा पर्याय राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. कारण विषयानुसार त्या विद्यालयात शिक्षक मिळणे गरजेचे आहे, शिक्षक मिळाला तरी वेळापत्रक बनविणेही जिकरीचे ठरेल, असे एका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. परंतु यावर्षीपासून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर शाखेचा उल्लेख नसणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Student Syllabus
GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

शालान्त मंडळ आशावादी?

दहावीनंतर यंदाच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असला तरी तो कला, वाणिज्य किंवा विज्ञान अशा शाखांसाठी नाही. अकरावीचा अभ्यासक्रम तोच राहणार असला तरी विषयानुसार विभागणी होणार आहे, विषयानुसारच वर्गांची रचना असणार आहे.

अकरावीच्या प्रवेशावेळीच ही विभागणी उच्च माध्यमिक विद्यालयांमार्फत केली जाईल. त्यासाठीच्या सूचना गोवा शालान्त मंडळाकडून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व्यवस्थापनाला दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com