
Valpoi: सत्तरी तालुक्याबरोबरच राज्यातील अन्य तालुक्यांतही जी ज्वलंत समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे रानटी प्राण्यांकडून वारंवार होणारी शेती-बागायती पिकांची नुकसानी. दरवर्षी या समस्येने शेतकरी वर्ग त्रस्त बनलेला आहे. त्यामुळे काय करायचे, हा अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे.
दरवर्षी नुकसान भरपाईसाठी अर्ज करायचे, कागदपत्रे द्यायची, ही कटकटीची कामे कायमची मिटण्यासाठी आता सरकारने सरसकट एकरी जागेनुसार सरासरी नुकसान भरपाई देण्यासाठी विचार करावा, असे साकडे सत्तरीतील शेतकरी, बागायतदार वर्ग सरकारला घालत आहे. त्यामुळे दरवर्षी एकदाच जागेनुसार, क्षेत्रफळ, पीक, पिकाचा प्रकार, वगैरे गोष्टी लक्षात घेऊन सर्वांनाच नुकसान भरपाईची सोय केली तर एक आधार बनणार आहे.
रानटी प्राणी जसे गवे, खेती, माकड, रानडुक्कर, शेकरे आदी वन्यप्राणी वर्ग राज्यातील सर्वच शेतकरी वर्गाच्या जमिनीत जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. हे चित्र सरसकट सगळीकडे पाहावयास मिळते. त्यामुळे दरवेळी अर्ज करणे हे कटकटीचे काम बनले आहे व त्यातही सर्वांनाच नुकसानभरपाई वेळेत मिळते असेही नाही.
त्यामुळे आतातरी सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करून दरवर्षी एकदा तरी धोरण राबवून योजनेमार्फत जागेनुसार सरासरी नुकसान भरपाई दिली तर आधार मिळणार आहे. कारण ही नुकसानी सर्वच शेतकरी वर्गाला होते आहे. खेती, माकडांचा एकाचवेळी शंभर-दोनशेचा झुंडच येऊन पिकाची नासाडी करीत आहे.
दरम्यान, सरकारने जंगलात फळझाडांची लागवड करणे, वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे व गावाच्या दिशेने असणाऱ्या जंगलाला कुंपण घालणे हे करून वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी करता येईल. काही देश आपल्या स्वार्थासाठी जैविक विविधता घालवून बसले आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी आम्हीही ती घालवली तर फार मोठे नुकसान सोसावे लागेल. ती सांभाळणे आपले कर्तव्य आहे, असे मत आंबेडे-नगरगाव येथील दत्तगुरू वझे यांनी व्यक्त केले.
एवढे दिवस गवे कुळागरातून फिरत होते; परंतु आता नासधूस करत आहेत. रात्रीच्यावेळी गावातून घरी जाणेदेखील धोकादायक झाले आहे. गवे, खेती, माकड, शेकरे, साळ आणि डुक्कर या एवढ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गवे काजूची रोपे, कलमे मोडून टाकत आहेत. सरकारकडे अनेक अर्ज विनंत्या केल्या; परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता सरकारने सरसकट एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे. - विनय बापट, धावे बाग-सत्तरी
सत्तरी तालुक्यातील शेतकरी वर्गाचे जीणे कठीण होऊन बसले आहे. रानटी प्राण्यांमुळे नागरिक त्रस्त असून बागायती पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसानी केली जात आहे. त्याचा आर्थिक फटका बळी राजाला बसत आहे. - झेरो गावकर, भिरोंडा-सत्तरी
दरवेळी जेव्हा जेव्हा नुकसान होईल त्या त्या वेळी अर्ज करणे तपासण्या करणे कागदपत्र तयार करणे यामध्ये बराच वेळ व पैसा वाया जातो व हे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून एक साधी गोष्ट शासन करू शकते ती म्हणजे शेतकऱ्याचं पीक, क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार वगैरे गोष्टी लक्षात घेऊन वार्षीक एक ठोक रक्कम ठरवता येईल. जी वरील गोष्टींच्या आधारावर शेतकऱ्याला द्यावी. - दत्तगुरु वझे, आंबेडे-नगरगाव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.