सांगे, आजच्या डिजिटल युगात सर्वचजण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना सांगे भागातील भाटी, नेत्रावळी भाग मात्र अजूनही इतर शहरांच्या तुलनेत बराच मागे आहे.
वीज खंडित होताच त्याचक्षणी मोबाईल बंद पडण्याचा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच असून सुधारणा म्हणून काहीच उपाययोजना केली जात नसून केवळ वेळ मारून नेली जात आहे.
तांत्रिक युगात आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू असून ग्रामीण भाग आजही भारत दूरसंचार निगमच्या ताब्यात असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना या यंत्रणेच्या कर्माची फळे भोगावी लागत आहेत. बाराजण-भाटी आणि नेत्रावळी अशा दोन्हीही ठिकाणी बीएसएनएलच्या टॉवरची गत एकाचसारखी झाली असून वळवाच्या पावसाप्रमाणे आता आहे तर आता नाही अशी स्थिती आहे. वीज गायब होताच मोबाईल बंद होतात.
या पद्धतीत सुधारणा होणार तरी कधी, हा प्रश्न आहे. दरवर्षी आणि खासकरून पावसाळ्यात मोबाईल सेवा विस्कळीत झालेली असते. भारत दूरसंचार निगमच्या यंत्रणेला कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती बनल्याची तिखट प्रतिक्रिया प्रीतेश कुर्डीकर या युवकाने व्यक्त केली आहे.
खासगी कंपन्यांना मुभा द्यावी!
वीज गायब झाल्यास बॅकअपसाठी आजही भारत दूरसंचार निगमकडे कसलीच यंत्रणा नाही. येथे एक कर्मचारीसुद्धा नसल्याने यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून लाकडी काठीचा टेकू देण्याची नामुष्की बीएसएनएलवर आली आहे.
सरकारने एक तर सांगे भागातील दूरध्वनी यंत्रणा सुरळीत करावी किंवा ते शक्य नसल्यास इतर खासगी कंपन्यांना आपली सेवा चालविण्याची मुभा द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल युगात चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.