सांगे तालुक्यातील नेत्रावळी येथे जंगलमय भागात वसलेल्या साळजिणी गावात शिकारीला गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ कर्मचाऱ्यांना बंदूक तसेच जीवंत काडतुसांसह नेत्रावळी रेन्जच्या वन अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
आणखी दोघेजण अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. असले तरी वन अधिकारी त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले.
नेत्रावळी अभयारण्य भागात वन खात्याचा स्वतंत्र तपासणी नाका आणि प्रवेशद्वार आहे. असे असतानाही लोक बंदूक, जीवंत काडतुसे आणि जेवणाचे साहित्य घेऊन रात्रीच्या वेळी कसे काय जंगलात जातात, असा प्रश्न या प्रकरणाच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळ्यात वाहनांची कसून तपासणी केल्यास शिकारी तपासणी नाक्यावरच सापडू शकतात, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सोळाजणांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात अाली. त्यांना पाच दिवस वन खात्याच्या कार्यालयात हजेरी लावण्यास सांगितले आहे.
अन् अलगद जाळ्यात
वन खात्याची ही या भागातील अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी कामगिरी आहे. यापूर्वीही वन खात्याने शिकारीसाठी गेलेल्यांना मुद्देमालासह पकडले असल्याची प्रकरणे असताना एकाच वेळी सोळाजण शिकार करण्यासाठी जंगलात जातात कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शिकारीचे साहित्य जप्त केले आहे.
दुसऱ्यांदा अटक
कदंब महामंडळाच्या ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकजण यापूर्वीही या जंगलात शिकारीसाठी गेला असता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले होते. आता त्याला वन अधिकाऱ्यांकडून अटक होण्याची ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणाची चर्चा आज राज्यभरात सुरू होती.
नेत्रावळी अभयारण्यात शिकारीसाठी गेलेल्या ‘कदंब’च्या
१६ कर्मचाऱ्यांना वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती काही तासांपूर्वी समजली. मी रविवारी लईराई देवीच्या उत्सवासाठी गेलो होतो. या घटनेबाबत उद्याच (१३ मे) महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.