सांगे, कृषी खात्याकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या निधीत नेत्रावळी सरपंचांनी अपहार केल्याची तक्रार राखी नाईक यांनी सांगे पोलिसांत केली होती.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.२०) कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत विचुंद्रे येथे घेतलेल्या बैठकीत कोणताही अपहार झाला नसल्याचे सिद्ध केले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, ‘नेत्रावळीचे सरपंच वरक यांनी सचिवांची खोटी सही करून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा निधी लाटाला’, असा आरोप करण्यात आला होता. प्रत्यक्षात आक्षेप नोंदवण्यात आलेल्या सह्या या मूळ सचिवाच्या रजा कालावधीत दाखल झालेल्या अन्य प्रभारी सचिवाने केल्या असल्याचे बैठकीत साऱ्यांसमोर स्पष्ट करण्यात आले.
१० कोटींचा निधी कृषी खात्याकडून मंजूर झाला असून, त्यापैकी १० टक्के निधीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य कृषी संचालक संदीप फळदेसाई, उपसंचालक दत्ताराम प्रभुदेसाई, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, नेत्रावळीचे सरपंच बुंदा वरक, पंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
कोण चोर ते सांगावे!
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत मोठा घोटाळा केल्याची खोटी माहिती देऊन लोकांना चुकीचा संदेश देण्यात आला. आपल्याविरोधात पोलिस तक्रारी करण्यात आल्या असून सर्व त्या चौकशींना सामोरे जाण्यास आपण तयार आहे, नेत्रावळीचे सरपंच बुंदा वरक यांनी सांगितले. यावेळी समितीच्या सदस्यांनी आम्हाला चोर चोर म्हणून हिणविले त्यांनी आता कोण चोर ते सांगावे, अशी मागणी केली.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, निधीचे वितरण?
१केंद्रीय कृषी खात्याकडून मिळणारा उपरोक्त निधी महिला बचतगट, पाणलोट करणारे संघ, सामाजिक उपक्रम अशा घटकांना दिला जातो. जो निधी बिनव्याजी असून पाच वर्षांत परतफेड करायची आहे.
२सरपंचांच्या अध्यक्षतेखाली नऊजणांची समिती लाभार्थ्यांची केवळ शिफारस करते. या समितीला निधी वितरणाचा अधिकार नाही. शिवाय अन्य कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसून कृषी खात्याने अर्जाला मंजुरी दिल्यानंतर बॅंक रक्कम वितरण करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.