

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातून (आरजीपी) काही महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या दहा सदस्यांची शिस्तपालन समितीमार्फत चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
पक्षविरोधी कारवायांप्रकरणी आरजीपीचे तत्कालीन सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी आदित्य देसाई, प्रेमानंद गावडे, विशाल गावस देसाई, प्रशांत पागी, राहुल नाईक, डॅग्ले फर्नांडिस, मल्विन डिसिल्वा, ल्युसिओ रॉनकॉन, मनिला शिरोडकर आणि सज्जन नाईक अशा दहा जणांचे निलंबन केले होते. त्यांच्या निलंबनानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस वाढल्यानंतर मनोज परब यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत, राजकारणातूनही संन्यास घेत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर विश्वेश नाईक–माजी खजिनदार अजय खोलकर व आमदार वीरेश बोरकर या दोन गटांतील वाद उफाळून आला. त्यामुळे आमदार वीरेश यांनी स्वत:ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर आता निलंबित केलेल्या दहाही जणांची शिस्तपालन समितीमार्फत चौकशी करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.
दरम्यान, निलंबित दहा जणांवर करण्यात आलेले आरोप, पक्ष कार्यालयातील साहित्य, नोंदी तसेच तत्कालीन परिस्थिती दहा जणांना निलंबित करण्यास पुरेसा पुरावा ठरत नसल्याचे शिस्तपालन समितीला आढळून आले. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
आघाडीची चर्चा विधानसभा अधिवेशनानंतर
विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत काँग्रेस आणि आरजीपीतील चर्चा विधानसभा अधिवेशनानंतरच सुरू होणार आहे. आघाडीच्या चर्चेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्वतंत्र समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे वीरेश बोरकर यांनी शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.