

पणजी: विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी ‘आरजी’ने अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती स्थापन केली आहे. तसेच पुढील ३० दिवसांत आघाडीसंदर्भातील चर्चा पूर्ण करण्याची विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना केली आहे. आपले प्रस्तावही काँग्रेसला सादर केले आहेत.
नावेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आमदार तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर, रोहन नाईक, कॅन्डिडो कोरिया, नीरज धामस्कर आणि सिद्धार्थ नाईक यांचा समावेश आहे.‘‘गोव्याची अस्मिता, जमीन, रोजगार, पर्यावरण, निसर्ग संवर्धन, शाश्वत विकास आणि गोव्याचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक व सांस्कृतिक स्वरुप यांचे रक्षण यांसारख्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमधील समान भूमिका लक्षात घेऊन वीरेश बोरकर यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत औपचारिक चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे.
तसे चोडणकर यांना सादर केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. ‘आरजी’साठी हा केवळ राजकीय गणिताचा विषय नाही. हा गोव्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आमची जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि आमच्या तरुणांच्या आकांक्षा यांच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस पक्षासमोर ठेवलेले प्रस्ताव
गोवा आणि गोमंतकीयांच्या हिताच्या रक्षणावर केंद्रीत असलेला किमान समान कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीसाठी पारदर्शक आणि परस्पर संमतीने होणारे जागावाटप, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक समन्वय, पक्षबदलू तसेच फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना रोखण्यासाठी उपाययोजना, गोव्याच्या भविष्यावर लक्ष केंद्रीत करणारी प्रचार मोहीम आणि सामायिक राजकीय दृष्टिकोन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.