माणसे कायदा तयार करतात व नंतर कायदा माणसांना. आम्ही समाज म्हणजे नेमके काय? हे समजून घेतले पाहिजे. देशभक्ती ही कोणीही एखाद्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.
पण अलीकडे देशभक्ती पेक्षा राष्ट्रवाद वाढलेला आहे, अशी खंत उद्योगपती अवधूत तिंबलो यांनी अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
ते म्हणाले, आता कायद्याचा आधार घेणे गरजेचे ठरलेले आहे. केवळ न्यायव्यवस्थाच आम्हांला वाचवू शकते. गोव्यामध्ये असलेल्या समान नागरी संहितेमुळे आम्ही येथे स्थिर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा कायदा देशभर लागू करू पहात आहे, त्यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहिजे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९१ साली केलेल्या कायद्यातील बदलामुळे खाण उद्योग तेव्हा वाचू शकला. त्यांना हल्लीच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून या सरकारने योग्य निर्णय घेतला. हा आपला सत्कार म्हणजे आपल्या मूळगावी म्हणजे मडगाव शहरात मिळालेला एका प्रकारचा नोबेल पुरस्कारच आहे.
हा सत्कार सोहळा उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या अध्यक्षतेखालील अवधूत तिंबलो सत्कार समितीने मडगावच्या गोमंत विद्या निकेतनाच्या मुख्य सभागृहात आज आयोजित केला होता.
अरविंद भाटीकर, ज्येष्ठ वकील जे. ई. कुएल्हो परेरा, वकील क्लेओफात आल्मेदा कुतिन्हो तसेच सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा. माधव कामत यांनी तिंबलो यांनी गोव्याच्या सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव योगदानाबद्दल प्रशंसा केली. अंजू तिंबलो यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
उद्योगपती श्रीनिवास धेंपो, प्रविण गोसालिया, उदय भेंब्रे, अवधुत तिंबलो यांचे पुत्र अंबर व आकाश व इतर कुटुंबीय व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दिलीप प्रभुदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले. तिंबलो सत्कार समितीचे अध्यक्ष दत्ता दामोदर नायक यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.