

पणजी: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (पीएमजीकेएवाय) राज्यातील लाभार्थींची संख्या चार वर्षांत सुमारे ५४ हजारांनी घटल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून उघड झाले आहे.
कोविडच्या काळात गरिबांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. या योजनेचा देशभरातील सुमारे ८० कोटी गरीब नागरिक लाभ घेत आहेत. योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील (एनएफएसए) पात्र शिधापत्रिकाधारकांना गहू किंवा तांदूळ पूर्णपणे मोफत दिले जातात.
‘पीएचएच’ धारक कुटुंबांना प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतात. तर, अंत्योदय अन्न योजना (एएवाय) कार्ड असलेल्यांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. केंद्र सरकारने या योजनेचा विस्तार केला असून, मोफत अन्नधान्य देण्याची तरतूद २०२८ पर्यंत वाढवली आहे.
दरम्यान, २०२३ मध्ये राज्यातील सुमारे ४,८५ लाख जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यानंतरच्या चार वर्षांत म्हणजेच २०२६ मध्ये हा आकडा सुमारे ४.३१ लाख इतका झाल्याचे मंत्री बांभनिया यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
‘पीएमजीकेएवाय’चे लाभार्थी (गोवा)
वर्ष लाभार्थी
२०२३ ४,८५,७५४
२०२४ ४,७९,०७९
२०२५ ४,७५,९८८
२०२६ ४,३१,६७४
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.