

पणजी: फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजपने आपल्याला उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याची आपलीही तयारी आहे. परंतु, पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असे माजी कृषीमंत्री स्व. रवी नाईक यांचे कनिष्ठ सुपूत्र रॉय नाईक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राय म्हणाले की, फोंडा पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षच घेईल. पक्षाने मला निवडणूक लढवण्यास सांगितले तर आपण तयार आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, तो निवडणुकीच्या रिंगणात असेल. निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे कोण काय म्हणते, यावर आपण भाष्य करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रवी नाईक यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे फोंड्याची जागा रिक्त झाली असून, तेथे सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपूत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडणूक देण्याची मागणी प्रथम मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली होती.
त्यानंतर त्यांचे बंधू तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षाची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यातच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रितेश नाईक यांना आताच मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे आणि पोटनिवडणुकीची त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणावे, अशी मागणी केली. पण, मगोचे नेते तथा गत विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांच्याविरोधात अवघ्या ७७ मतांनी पराभूत झालेल्या डॉ. केतन भाटीकर यांनी फोंड्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
दिवाळीचा सण संपल्यानंतर पक्षाकडून फोंडा पोटनिवडणुकीची तयारी सुरू होईल. बिहारमधील मतदान संपल्यानंतर आपण आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांची भेट घेऊन फोंड्यातील उमेदवाराबाबत चर्चा करू. परंतु, उमेदवार निवड पक्षाच्या प्रक्रियेनुसारच होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.