
डिचोली: ‘खाणप्रश्न सुटला नाही, तर आम्ही उद्ध्वस्त होऊ’ अशी भीती पिळगावच्या ट्रकमालकांना सतावत आहे. दुसऱ्या बाजूने गृहिणीही चिंतेत सापडल्या आहेत. खनिज व्यवसायावर संक्रांत आली तर आम्ही संसार कसा करावा? आमच्या मुलाबाळांचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. काल मंगळवारी रात्री उशिरा ट्रकमालक तसेच त्यांची कुटुंबे एकत्र आली आणि त्यांनी आपली कैफियत मांडली.
‘वेदान्ता’ खाणप्रश्न सध्या न्यायालयापर्यंत (Court) पोचला आहे. त्यामुळे समस्त ट्रकमालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष न्यायालयीन निवाड्याकडे लागून राहिले आहे. खाणबंदीमुळे आधीच बारा वर्षे वनवास काढला, आता पुन्हा खाणबंदीचे संकट आले तर आमचा संसारच उघड्यावर येईल, आम्ही रस्त्यावर येऊ, अशी भीती ट्रकमालकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तसेच या गुंता तातडीने सोडवावा, असे साकडे सरकारला घातले आहे.
बारा वर्षांच्या खाणबंदीमुळे ट्रकमालक आधीच आर्थिक संकटात गटांगळ्या खात आहेत. बहुतांश ट्रकमालकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. खाणबंदीच्या काळात मुलाबाळांचा सांभाळ करताना अक्षरशः हालअपेष्टा सहन केल्या. आताच कुठे तरी खाण सुरू होऊन ट्रकांना काम मिळाले होते. कर्ज घेऊन मोडतोड झालेल्या ट्रकांची दुरुस्ती केली व खनिज वाहतुकीसाठी ट्रक रस्त्यावर उतरविले. परंतु पुन्हा खनिज वाहतूक बंद झाल्याने आमच्यासमोरील संकट आणखी गडद झाले आहे, असे ट्रकमालक लक्ष्मण सावंत, बाबलो मोर्लेकर आणि अन्य ट्रकमालकांनी सांगितले.
खाणबंदीच्या काळात घर, संसार चालवणे कठीण बनले. मुलाबाळांचे शिक्षण व अन्य खर्च करताना तारेवरची कसरत करावी लागली. मन मारून जगावे लागले. अंगावरील दागिनेही गहाण ठेवण्याची वेळ आली. आत्ताच कुठे खनिज व्यवसाय सुरू झाल्याने मागचे संघर्षमय जीवन विस्मृतीत जात असतानाच पुन्हा संकट उभे ठाकले आहे. खाणबंदी काळातील दिवस डोळ्यांसमोर तरळू लागले आहेत. खनिज व्यवसाय बंद झाला तर आम्ही संसार कसा करायचा? असा प्रश्न दिया वायंगणकर, यशोदा पेडणेकर आदी गृहिणींनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.